जलवर्धिनीच्या पर्जन्य जलसाठवण उपक्रमाची सुरेश प्रभूंकडून दखल

रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून कोकणासह विविध ठिकाणी राबविलेल्या पावसाचे पाणी साठवण्याच्या उपक्रमाची माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

बबनराव पटवर्धन, डॉ. विनय नातू, सुरेश प्रभू, उल्हास परांजपे

श्री. प्रभू खासगी दौऱ्यानिमित्ताने पोचरी (ता. संगमेश्वर) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक बबनराव पटवर्धन यांच्या मूळ घरी असलेल्या जलसाठवण टाकीची पाहणी केली. जलवर्धिनी प्रतिष्ठान या संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार ही टाकी बांधण्यात आली आहे. त्यामध्ये पावसाचे ५० हजार लिटरहून अधिक पावसाचे पाणी साठविले जाते. प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी श्री. प्रभू यांना या उपक्रमाची माहिती दिली. कमीत कमी खर्चात शेतकरी उघड्या माळरानावर पावसाच्या पाण्यासाठी कमी उंचीच्या टाक्या बांधू शकतात आणि त्यामध्ये पावसाचे थेट पडणारे पाणी साठवू शकतात. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो. या पद्धतीने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये जलवर्धिनी प्रतिष्ठानने अनेक ठिकाणी टाक्या बांधल्या असल्याची माहिती श्री. परांजपे यांनी श्री. प्रभू यांना दिली. या पद्धतीने दहा कोटी लिटरहून अधिक पाणी दरवर्षी विविध ठिकाणी साठविले जाते, असे श्री. परांजपे यांनी सांगितले.

अशा पद्धतीच्या किमान पंचवीस टाक्या गुहागर तालुक्यात ठिकठिकाणी बांधण्यात आल्याची माहिती गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी यावेळी दिली.

पाणी साठविण्यासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरून कशा पद्धतीने गावातील साधे गवंडीही या टाक्या बांधू शकतात, याविषयी रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनने पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. श्री. परांजपे यांनी लिहिलेली ही पुस्तिका त्यांनी श्री. प्रभू यांना दिली. ही पुस्तिका आणि बांधलेली टाकी पाहिल्यानंतर श्री. प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही याच पद्धतीने पाणी साठविण्यासाठी टाक्या बांधण्याचा मानस व्यक्त केला असून श्री. परांजपे यांना त्यासाठी निमंत्रित केले आहे.

फेरोसिमेंट टाक्यांचे प्रत्यक्ष बांधकाम करणारे विजय खरे यांच्यासह उल्हास परांजपे, बबनराव पटवर्धन, सुरेश प्रभू

जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती http://www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

संपर्कासाठी :
दूरध्वनी क्र. – ९८२०७८८०६१
ईमेल -jalvardhini@gmail.com

जलवर्धिनीविषयी माहिती

कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचे संकलन, संपादन आणि निर्मिती ‘कोकण मीडिया’ने केली आहे. परांजपे यांच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. (ई-बुक्स खरेदीच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.)

 ‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ आणि ‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ अशी त्या दोन पुस्तकांची नावे आहेत. पूर्वी प्रकाशित झालेली ही पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या पुस्तकांची किंमत अनुक्रमे १०० आणि १२५ रुपये असून, ई-बुक्स अनुक्रमे ८० आणि १०० रुपयांत उपलब्ध आहेत. ही ई-बुक्स गुगल प्ले बुक्सवर असल्याने खरेदी केल्यावर वाचकांना मोबाइलवरच सहजपणे वाचता येतील. सध्या लॉकडाउनच्या काळात हळूहळू सर्व व्यवहार सुरू होऊ लागले असले, तरी पुस्तकांची दुकाने किंवा पुस्तके घरपोच मिळण्याची सोय अद्याप सुरळीत सुरू झालेली नाही. अशा स्थितीत ई-बुक्स हा वाचनाचा सोपा पर्याय आहे. (ई-बुक्स खरेदीच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.)

‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ हे पुस्तक किफायतशीर फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी खर्चात पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या तयार करण्याच्या तंत्राची माहिती देते. तसेच, सिमेंटच्या जोडीला स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक धाग्यांचा वापर करून कमी खर्चात टाक्या तयार करण्याच्या तंत्रांची माहिती ‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ या पुस्तकात दिलेली आहे. ही दोन्ही पुस्तके मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत असून, दोन्ही पुस्तकांमध्ये भरपूर छायाचित्रांच्या साह्याने विषय सोपा करून समजावून सांगण्यात आला आहे.

पाणीवाले परांजपे यांच्याविषयी…
पावसाचं पाणी साठवण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तन-मन-धनाने झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उल्हास परांजपे. ज्येष्ठ नागरिक असूनही ते संपूर्ण कोकणात, तसेच इतरही अनेक ठिकाणी फिरून याबद्दल मार्गदर्शन करतात, किफायतशीर खर्चात आणि स्थानिक उपलब्ध साहित्यात पाण्याच्या टाक्या बनविण्याचं प्रशिक्षण देतात, आवश्यक तिथे स्वतःच्या खर्चाने टाक्या उभारूनही देतात. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नांनी काही लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली आहे. म्हणूनच त्यांना पाणीवाले परांजपे अशी ओळख मिळाली आहे. जलवर्धिनी प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते कार्य करतात.

पुस्तकांच्या खरेदीसाठी पुस्तकांच्या नावासमोरील लिंकवर क्लिक करावे.
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply