रत्नागिरी : टपाल विभागातर्फे गेल्या १२ सप्टेंबर रोजी बचत योजनांचा महोत्सव सुरू झाला असून तो येत्या ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ७९ उपडाकघरे आणि ५८४ शाखा डाकघरांमध्ये नवीन खाते उघडण्याची विशेष मोहीम या काळात राबविण्यात येणार आहे. पोस्टाच्या विविध योजनांची माहिती व त्यांचे फायदे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
या बचत योजनेच्या महोत्सवात रत्नागिरी विभागाकडून टपाल खात्याच्या सेव्हिंग खाते, आवर्ती ठेव योजना, छोट्या कालावधीसाठी मुदत ठेव योजना, निवृत्त नागरिकांसाठी मासिक प्राप्ती योजना, तसेच ६०, ५८ आणि ५५ वर्षांनंतर व्हीआरएस घेतलेल्या नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना, चक्रवाढ पद्धतीने व्याजावर व्याज मिळणारी तसेच इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणारी आणि मुदतीअंती सर्व रक्कम टॅक्स फ्री देणारी भविष्य निर्वाह निधी योजना आणि शून्य ते १० वयोगटातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र ही १० वर्षे ४ महिने मुदतीची दामदुप्पट योजना, इन्कम टॅक्ससाठी उत्तम गुंतवणूक म्हणून राष्ट्रीय बचत पत्र योजना इत्यादी योजनांचा त्यात समावेश आहे.
यासोबतच सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत अटल पेंशन योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही १८ ते ५० वयोगटासाठी योजना असून या योजनेत ३३० रुपये वार्षिक प्रीमियम भरल्यास खातेदाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपये मिळतात. प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेत वार्षिक केवळ २० प्रीमियमद्वारे खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख मिळतात.
सद्यःस्थितीत टपाल खात्यातील योजनांचे व्याज दर इतर बँकांच्या व्याजदरांपेक्षा नक्कीच अधिक आहेत. या योजना केंद्र सरकारच्या असल्यामुळे सुरक्षेचे कवच भक्कम आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

