संगमेश्वर : कोकण रेल्वेवरील संगमेश्वर रोड स्थानकात विविध ठिकाणी अस्वच्छतेमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबविले असले तरी कोकण रेल्वेला त्याचे काही घेणे-देणे नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत या संकल्पनेअंतर्गत कोकण रेल्वेने सर्व स्थानकांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. परंतु थोड्याच दिवसांत त्याचा बोजवारा उडालेला दिसत आहे.
संगमेश्वर रोड स्थानक परिसरात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पाणी पिणेही धोकादायक झाले आहे. या स्थानकातून कोकण रेल्वेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. परंतु प्रवाशांना सेवा-सुविधा कोणतीच मिळत नाही.
स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नळ गायब झाले आहेत. स्थानकात असलेल्या पाणपोयांना पाणी असेलच याची शाश्वती नसते. स्थानक परिसरातील शौचालयाची अवस्थाही बघवतच नाही.
या गैरसोयीची आणि अस्वच्छतेची दखल संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक प्रशासन घेईल का, असा सवाल प्रवाशांच्या वतीने पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश जिमन यांनी उपस्थित केला.









