रत्नागिरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तारांगणाविषयी व्यक्त केलेले विचार.
……..
वैज्ञानिक पैलू असण्याची गरज राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. मुळात मनुष्यप्राणी स्वभावत: कुतूहल असणारा प्राणी आहे आणि याच कुतूहलातून तो निरनिराळे प्रयोग करीत आला आणि याच प्रयोगातून निरनिराळे शोध लागले. प्रगत तंत्र विकसित होत आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचलो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहत असताना नवीन पिढीमध्ये संशोधन वृत्ती तयार व्हावी, यास्तव सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरीतील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’हा त्यातीलच एक प्रयत्न आहे.
मी स्थानिक आमदार झाल्यानंतर तारांगणाची संकल्पना प्रथम मांडली आणि त्याचा पाठपुरावा सुरू झाला. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यातून ही वास्तू आज साकारली आहे.
यात केवळ तारांगणाचा प्रकल्प ११ कोटी ५८ लाख रुपयांचा आहे. यातील स्थापत्यकामाची किंमत ५ कोटी ६८ लाख एवढी आहे, तर प्रत्यक्षात तारांगणासाठी लागणारी अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा 3-डी प्रक्षेपण साहित्य आणि सुसज्ज असे वातानुकूलित थिएटर यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जगात सर्वोत्तम अशी तारांगण निर्मिती यामुळे शक्य झाली आहे. या ठिकाणी कार्यक्रम सादरीकरणासाठी खुल्या व्यासपीठाचीही उभारणी स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.
तारांगणात येणारे विद्यार्थी आणि पर्यटकांना पहिला प्रक्षेपण कालावधी संपेपर्यंत फिरण्याची व्यवस्था आहे. दुसऱ्या टप्प्यात या तारांगणालगत ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करून येथे कलादालन (आर्ट गॅलरी) उभारण्यात आले आहे. स्थानिकांची गुणवत्ता यामुळे जगासमोर येण्यास मदत होईल. सोबतच विज्ञान गॅलरी या ठिकाणी विकसित होत आहे. त्यावर एक कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्च होणार आहेत.
सर्वांना एकाच ठिकाणी कला आणि विज्ञानाचा संगम या वास्तूत आगामी काळात बघायला मिळेल. त्याच दृष्टिकोनातून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करीत असताना नियोजन करून ते कार्य साकारण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि येत्या पिढ्यांना एक मोलाचा साठा तयार करून दिला आहे.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. कुतूहलाला मर्यादा नाही. त्यामुळे संशोधनाचे क्षेत्रदेखील त्याच पद्धतीने अमर्याद आहे. मराठीत म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. कल्पनाशक्तीवर असंख्य बाबी अवलंबून असतात. त्याचाच आणखी पुढचा टप्पा म्हणजे अवकाश संशोधन अर्थात खगोल विज्ञान. कधी काळी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, असे मानले जात होते. ही धारणा संशोधनातून रद्दबातल ठरली आणि हळूहळू विश्वाचा पसारा किती अवाढव्य आहे, याचा खुलासा आपणास व्हायला लागला. अवकाश अमर्याद आहे आणि त्यात संशोधनदेखील.
हॉलंडमध्ये १६०८ साली टेलिस्कोपचा शोध लागला. त्यात आवश्यक त्या सुधारणा करून १६११ साली गॅलिलिओने त्याचा वापर अवकाशात डोकावण्यासाठी केला. त्यानंतर गेला ४०० वर्षांहून अधिक काळाच्या प्रवासात विविध प्रकारे अवकाशाचा वेध आपण घेत आहोत. नोबेल पदक मिळविणारे शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा या विश्वाचा धांडोळा घेण्यात मोलाचा वाटा आहे. ज्यांनी शोधलेल्या स्पेक्ट्रोग्राफिक किरणांच्या आधारे विश्वाच्या नवनव्या अंतरांचा वेध घेण्यात येतो. त्याचप्रमाणे रेडिओ लहरी, एक्स-रे अर्थात क्षकिरणे, इन्फ्रारेड तसेच अल्ट्रा व्हायोलेट किरणांचीदेखील यात मदत होते.
पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन उपग्रहांच्या माध्यमांमधून वेध घेण्यासोबत अवकाशात उभारण्यात ‘हबल’ टेलिस्कोप अर्थात अंतराळ दुर्बिणीने विश्वाचे अंतरंग किती विस्तीर्ण आणि विराट आहे, याचे स्वरूप आपल्याला कळायला लागले. अंतराळात २५ डिसेंबर २०२१ रोजी पाठविण्यात आलेली अंतराळ दुर्बीण जेम्स वेब कार्यान्वित झाल्याने या संशोधनास आता अधिक गती प्राप्त झाली आहे. हा या मालिकेतील सर्वांत ताजा अध्याय म्हणता येईल. आपल्या आयुष्यातदेखील कुतूहलाचा हा भाग असतो आणि पुराणकाळापासून याचे दाखलेदेखील आपणास सापडतील.
पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असले तरी समुद्रकिनाऱ्यावरील जीवनात याला अधिक महत्त्वाचे स्थान आहे. सागरी जीवन पूर्णपणे त्यावर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सागरास येणारी भरती-आहोटी आणि आकाशातील त्या चंद्रकलांमुळे घडणारे बदल यात अमावास्या आणि पौर्णिमा याभोवती सागरी आणि सागर किनाऱ्यावरील जीवन अधिक अवलंबून असते. या साऱ्याचा अभ्यास करण्यासाठी विविध साधनांची आवश्यकता असते.
अंतराळाचा वेध घेण्याची आवड अनेकांना आहे. याची तोंडओळख रत्नागिरीसारख्या ठिकाणी झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या माध्यमातून सर्वांना होणार आहे. अतिशय अद्ययावत आणि त्रिमिती (3D) तारांगण असणाऱ्या या वास्तूच्या रूपाने नव्या पिढीतील कुतूहलाची उत्तरे मिळू शकतील आणि यातून या भूमीतून या क्षेत्रात संशोधन करण्यास अनेकजण पुढे येतील.
विज्ञान हे प्रगतीचे साधन आहे आणि संशोधन हा प्रगतीचा मार्ग आहे. भारतात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) यात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्याआधारे आपण चांद्रयान आणि मंगळयानासारख्या मोहिमा आखल्या. मंगळावर आपला उपग्रह पोहोचला. याला नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे.
रत्नागिरीत इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीज प्रा. लि.ने या सुसज्ज तारांगणाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. भारतात आजवर ५० हून अधिक तारांगणे उभारण्यात आली आहेत. मुंबईतील नेहरू तारांगण देशातील पहिले डिजिटल तारांगण ठरले, तर देशातील पहिले डिजिटल 3-D स्वामी विवेकानंद तारांगण मंगलोर येथे आहे. रत्नागिरीत आकारास आलेले 3-D तारांगण देशातील या स्वरूपाचे पाचवे तारांगण आहे.
आपण चांद्रयान पाठविणाऱ्या प्रगतिशील देशातील नागरिक असून संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी अशा तारांगणाची गरज आहे. ही गरज या तारांगणाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. पुढच्या पिढीसाठी अशा स्वरूपाच्या वास्तू प्रेरणादायी राहणार असून हा रत्नागिरीच्या पर्यटन आणि शिक्षण मार्गावरील मैलाचा दगड ठरणार आहे.
- उदय सामंत,
उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य









