‘सामर्थ्य आहे श्रमांचे’ हे आगाशे यांचे पुस्तक पालकांना प्रेरणादायी : सुमेध वडावाला-रिसबूड

रत्नागिरी : अनंत आगाशे यांचे ‘सामर्थ्य आहे श्रमांचे’ हे पुस्तक तरुणांपेक्षाही आजच्या आणि उद्याच्या पालकांना प्रेरणा देणारे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीतील अनंत वस्तू भांडार ते आगाशे एम्पायर या चाळीस वर्षांच्या किराणा व्यापाराच्या वाटचालीबद्दल अनंत आगाशे यांचे ‘सामर्थ्य आहे श्रमाचे’ हे आत्मकथनपर पुस्तक रत्नागिरीतील सिद्धिविनायक कार्यालयात प्रकाशित झाले. या पुस्तकाचे शब्दांकन श्री. रिसबूड यांनी केले आहे. हे पुस्तक लिहिताना आलेल्या अनुभवांची माहिती प्रकाशन समारंभात त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘आगाशे म्हणजे किराणा मालाचे व्यापारी आहेत. रॉकेलच्या विक्रीपासून त्यांनी सुरू केलेला व्यवसाय, त्यांच्या पत्नीने आणि पुढच्या काळात मुलाने दिलेली साथ, त्यामुळे उभे राहिलेले आगाशे एम्पायरचे विश्व हे सारे प्रेरणादायी आहे. ही प्रेरणा तरुणांपेक्षाही आजच्या आणि उद्याच्या पालकांना अधिक प्रेरणा देणारी आहे. अगदी छोट्याशा उद्योगातून व्यवसाय कसा उभा राहू शकतो, त्यासाठी किती चिकाटी आवश्यक असते, किती श्रम आवश्यक असतात, हे या पुस्तकातून समजेल. तरुणांनी मनोरंजनासाठी आणि माहितीसाठी हे पुस्तक जरूर वाचावे; पण पालकांनी आपल्या मुलांना उद्योगाकडे वळविण्यासाठी पालकांना हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरेल.’

चिपळूण येथील व्यापारी मंदार ओक यांनी सांगितले, की इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा किराणा व्यापार करणे सर्वांत कठीण असते. दुकानदाराची चूक नसतानासुद्धा ग्राहकाकडून जेव्हा एखादा माल परत केला जातो, तेव्हा तो त्याला बदलून द्यावा लागतो. त्यामुळे ग्राहकाला सांभाळणे कठीण काम असते. ते सारे सहन करत किराणा मालाच्या व्यवसायात सचोटी आणि प्रामाणिकपणा ठेवून उत्कर्ष साधणे अनंत आगाशे यांना जमले. त्याचीच गाथा या पुस्तकात मांडली आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रेरणादायी आहे.

मराठी साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे खेड येथील पदाधिकारी उत्तमकुमार जैन यांनी सांगितले की, हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मकथन नव्हे तर सचोटीने व्यवसाय करताना स्वार्थाकडून परमार्थाकडे कसे जायचे, हे या पुस्तकातून समजते. प्रत्येक बाबतीत आगाशे यांचा सामाजिक दृष्टिकोन दिसून येतो. तोच अधिक प्रेरणा देणारा आहे. उद्योजकीय मानसिकता कशी तयार करावी, हे या पुस्तकातून समजते. मराठी माणूस त्यातही कोकणी माणूस, त्याच्या व्यापाराविषयी असलेले अनेक गैरसमज आगाशे यांच्या वागण्यातून आणि अर्थातच त्यांच्यावर आधारित आत्मकथनपर पुस्तकातून दूर झाल्याचे दिसून येते. प्रचलित सर्व गैरसमजांना छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आगाशे यांचा उल्लेख करता येईल.

अनंत आगाशे यांनी प्रास्ताविकात चाळीस वर्षांच्या आपल्या व्यवसायाचा धावता आढावा घेतला. रॉकेलच्या विक्रीपासून व्यवसायाला सुरुवात झाली, तेव्हा कोकणी माणसाच्या विशिष्ट मानसिकतेमुळे रॉकेल पुरवठा करायलाही दुकानदार तयार नव्हते. अशा स्थितीत अप्पा लोध यांनी केलेली मदत, त्यानंतर व्यवसायात हळूहळू वाढणाऱ्या व्यवसायात मिळत गेलेली मदत आणि ठामपणे उभे राहून ग्राहकांची सलोख्याचे संबंध ठेवून उभारलेला व्यवसाय त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. पतंजली योग, विविध संस्था आणि संघटनांमध्ये कार्य करण्याची, तसेच कलाकार म्हणूनही नाटक क्षेत्रात काम करण्याची संधी आपल्याला मिळाली, असेही श्री. आगाशे यांनी नमूद केले. ‘अनंत वस्तू भांडारचे नियमित ग्राहक संजीव लिमये यांनी पुण्यातील एका व्यापाऱ्याच्या प्रगतीविषयीचे पुस्तक वाचले होते. त्याच तऱ्हेचा माझा व्यवसाय असल्यामुळे त्याचे पुस्तक होऊ शकते. असे त्यांनी मला सुचविले आणि वारंवार पाठपुरावा केला. म्हणूनच हे पुस्तक लिहिले जाऊ शकले,’ असे श्री. आगाशे यांनी सांगितले.

बोरिवलीतील नवचेतना प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. प्रकाशक शरद मराठे समारंभाला उपस्थित नव्हते; पण त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेले निवेदन वाचून दाखवण्यात आले. संजीव लिमये, श्री. आगाशे यांना मदत करणारे दादा लोध, सुरुवातीच्या काळात दुकानातील पुड्या बांधायला शिकविणाऱ्यांपासून दलालांपर्यंत अनेकांना या वेळी मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योजिका गीता परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले.

(डावीकडून) गौरांग आगाशे, उत्तमकुमार जैन, मंदार ओक, गीता परांजपे, सुमेध रिसबूड, अनंत आगाशे आणि सौ. अनुजा आगाशे
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply