रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने रत्नागिरीतील गायकांसाठी येत्या १६ ऑगस्ट रोजी टॅलेंट सर्च कार्यक्रम आयोजित केला आहे.
आसमंत फाउंडेशनतर्फे येत्या १५ ऑगस्टला ‘अमृतवर्षा’ मुलतानी ते मारवा हा शास्त्रीय रागांवर आधारित कार्यक्रम रंगणार आहे. त्यातील गायक मेहेर परळीकर दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला टॅलेंट सर्च घेणार आहेत. नामवंत गायक अजय चक्रवर्ती आणि अन्य गायकांकडे गायनाचे धडे गिरवण्याची संधी रत्नागिरीत युवा गायकांना मिळणार आहे. त्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत रत्नागिरीतील इच्छुक गायकांची चाचणी घेतली जाईल.
नामवंत गायकांकडे शिकण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. परंतु त्या दिशेने जाण्याकरिता घ्यावयाचे कष्ट, तयारी, मेहनत यासंबंधीचे मार्गदर्शन आणि त्यातील उदयन्मुख गायकांना पुढे नामवंत गायकांकडे संधी मिळू शकते. रत्नागिरी सोडून या गायकांना मुंबई-पुण्यात जावे लागेल. श्री. परळीकर हे स्वतः आयटीसी स्कॉलर होते आणि पं. अजय चक्रवर्ती यांच्याकडे शिकले आहेत.
टॅलेंट सर्चमध्ये भाग घेण्यासाठी आसमंत फाउंडेशनचे संचालक नंदकुमार पटवर्धन (99700 56523) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

