रत्नागिरी : दुसऱ्या सागर महोत्सवाला आज रत्नागिरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. चार दिवसांच्या या महोत्सवातील भरगच्च कार्यक्रमांना आज सुरुवात झाली.
आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित द्वितीय सागर महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांनी भूषविले. ते म्हणाले, जगातील काही देश फक्त समुद्रावरच अवलंबून आहेत. त्यांची अर्थव्यवस्था त्यावरच चालते. भारताला लाभलेल्या सागरी ताकदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. समुद्रातील खनिजसंपत्ती, तेल, कोरल्स संशोधनासाठी मोठी संधी आहे. तसेच समुद्रात प्लास्टिक व अन्य प्रदूषण होऊ नये म्हणून काम केले पाहिजे. नेव्ही, कोस्टगार्ड, सागरी पोलिस संरक्षण करत आहेत. पूर्वीपासून भारतीयांना समुद्री व्यापाराची उत्तम माहिती, ज्ञान होते. परंतु इंग्रजांच्या काळात हे ज्ञान आपण विसरलो, आता ते पुन्हा आठवू या व प्रत्येकाने योगदान करू या. या साऱ्यातून भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन होणार आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक, एनआयओ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते.
महोत्सवाकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी- इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे. महोत्सवातील कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत.
डॉ. सुरेश नाईक म्हणाले की, मी ३४ वर्षे सागरी क्षेत्राशी निगडीत आहे. समुद्राचे जग वेगळे आहे. त्यात विविध प्राणी, वनस्पती, डोंगर- दऱ्या आहेत. आसमंतने आयोजित केलेल्या या महोत्सवाची संकल्पना खूपच सुरेख असून यापुढे नेहमी मत्स्य महाविद्यालय आपल्यासोबत आहे. यंदा आमचे विद्यार्थी थायलंड व अन्य देशांत अभ्यास दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना समुद्री जगातील घडामोडी समजल्या. आपणही समुद्री उपक्रमांत सहभागी झाले पाहिजे.
महोत्सवाची कल्पना खूपच आनंददायी आहे. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेमध्ये विकसित केलेल्या सी बोट रोबोचे प्रात्यक्षिक या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. संस्थेतर्फे रत्नागिरीतही संशोधनाचे कार्य सुरू आहे. सी बिड कल्टिवेशनचे काम सडामिऱ्या येथे सुरू आहे. तसेच कोरल्सची जैवविविधता यावरही रत्नागिरी व परिसरात संशोधन सुरू आहे. आतापर्यंत ५-६ कोरल्स शोधली आहेत. नवीन कोरल्सचा शोध सुरू आहे. मुंबई व गोव्याच्या मध्यवर्ती रत्नागिरी असल्याने येथे संशोधनासाठी आम्हाला येणे सोपे होते. येथील खारफुटी वा सागर किनाऱ्यांवरील जैवविविधतेचा उपयोग आम्ही संशोधनासाठी करतो. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा आठवडे संशोधन अभ्यास करावा लागतो. या विद्यार्थ्यांना रत्नागिरीमध्ये आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या मदतीने संशोधनाची जबाबदारी देऊ या. हे विद्यार्थी रत्नागिरीत येऊन काम करतील. त्याकरिता सामंजस्य करार करूया, असे डॉ. ठाकूर म्हणाले.
आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन प्रास्ताविकामध्ये म्हणाले की, आसमंत फक्त पर्यावरण, निसर्ग यासाठी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. नूलकर यांच्याशी चर्चेनंतर सागर महोत्सव सुरू झाला. पर्यावरण जागृतीसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरत आहे.

यावेळी आसमंतचे संचालक पुरुषोत्तम पेंडसे, नितीन करमरकर, श्रीप्रसाद देशमुख, जगदीश खेर आदींसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. दुहिता सोमण यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, आसमंत आणि सहकारी संस्थांच्या सोबत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय सामंजस्य करार करण्यास तयार आहे. महाविद्यालय आता स्वायत्त असून समुद्रविषयक अल्पकालीन व पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपले कामकाज सुरू झाले आहे. सागराबाबतची जाणीव निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होणार आहे.
१२ जानेवारीला सकाळी पुळणी किनारा अभ्यास फेरी होईल. यात मार्गदर्शक प्रदीप पाताडे, डॉ. अमृता भावे अभ्यासपूर्ण माहिती देतील. ९.३० वाजता आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान यावर डॉ. विजय मुळ्ये यांचे व्याख्यान, १०.३० वाजता लघुपट, ११.१५ वाजता वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी- इंडियाचे डॉ. अनंत पांडे सागरी सस्तन प्राण्यांवर व्याख्यान देतील. १२.१५ वाजता लघुपट, १.३० ते २ लघुपट, २ वाजता आसमंतचा किनारे संवर्धन प्रकल्प यावर डॉ. प्रशांत अंडगे यांचे व्याख्यान होईल. २.३० ते ३ या वेळेत इकोलॉजिकल सोसायटीच्या सायली नेरूरकर व्याख्यान देतील. ३ ते ४ या वेळेत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे व्याख्यान होईल. ४ वाजता लघुपट दाखवला जाईल. त्यानंतर ५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी या खडकाळ किनाऱ्यावर सफर निघेल. यात प्रदीप पाताडे मार्गदर्शन करतील.
भारतीय नौसेनेच्या युद्धनौका व पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स महोत्सवात ठेवली आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रत्नागिरीकरांनाही ही मॉडेल्स नक्कीच आवडतील. साधारण पाच फूट लांबीची ही मॉडेल्स महोत्सवादरम्यान पाहता येतील.




