रत्नागिरी : विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे येत्या सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रत्नागिरीत येत आहेत.
डॉ. काळे भाभा अणुसंशोधन केंद्रातून निवृत्त झाले आहेत. जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले असून भारतभर हे तंत्रज्ञान अनेक संस्था उपयोगात आणत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा, त्यांनी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने डॉ. काळे निवृत्तीनंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात व्यतीत करत आहेत. ते रत्नागिरीत येत असून हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जनसामान्यांसाठी ‘विज्ञान दृष्टी-विज्ञान संस्कार पर्यावरण आणि निसर्ग ऋण’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
सध्याच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर बदलत्या परिस्थितीनुसार काही संस्कार होणे महत्त्वाचे आहे त्यातीलच एक म्हणजे विज्ञान संस्कार होय. शालेय जीवनक्रमात ३०-३५ मिनिटांच्या तासिकेमध्ये विज्ञान समजणे आणि त्यावर विचार होणे दुरापस्त होते. विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यांनी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने डॉ. काळे रत्नागिरीत येत आहेत. ग्रंथाली प्रकाशनसोबत या उपक्रमाची सुरुवात त्यांनी “विज्ञान धारा” या व्यासपीठवरून २०२२ पासून केली आहे. रत्नागिरी तसेच राजापूर व आडिवरे येथील शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकांशी ते मुक्त संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत ७ ऑक्टोबर रोजी ते रत्नागिरीकरांसमोर आपले विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असून आसनक्षमता मर्यादित असल्यामुळे वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन येथील विज्ञानप्रेमी मंचातर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

