रत्नागिरी : ‘ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. सम्राट अशोकाने सम्राटपदाची जबाबदारी पेलली. छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला. अशा थोर व्यक्तींचं आयुष्य आपल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावं. त्यासाठी शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवली पाहिजे,’ असे विचार रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडले. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते.
‘हा कार्यक्रम म्हणजे केवळ माहितीचा नव्हे तर संस्कारांचाही संगम आहे. शाळेतील शिक्षक हे केवळ शिक्षक नसून, संस्कारवर्गाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याकडून शिक्षणाबरोबरच संस्कार मिळणे ही खूप मोठी संपत्ती आहे. प्रत्येकाने अमली पदार्थांपासून दूर राहावं आणि इतरांनाही दूर ठेवून आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं स्वास्थ्य टिकवावं. अमली पदार्थांमुळे केवळ मुलंच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बिघडतो. शिक्षकांनी स्वत:हून अशा कामात पुढाकार घेऊन नवी पिढी घडवावी. आरोग्यपूर्ण समाज घडवावा,’ असं डॉ. सामंत म्हणाले. या वेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, शिक्षक, दहावीचे विद्यार्थी, सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


