साने गुरुजींचा वारसा जपणारे गुरुवर्य गणपत शिर्के सर

सेवानिवृत्ती विशेष

सन २०१८ मध्ये लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्यावर शिर्के सरांनी आपल्या रचनात्मक कार्यशैलीने अल्पावधीतच प्रशालेला प्रगतिपथावर नेऊन ठेवले. शिक्षण, सामाजिक, साहित्य क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत असलेले शिर्के सर आपल्या ३४ वर्षांच्या निःस्पृह शिक्षकी सेवेतून ३१ डिसेंबर २०२१ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे अक्षरधन.

विद्वत्त्वं दक्षता शीलं
सक्रान्तिरनुशीलनम् ।
शिक्षकस्य गुणाः सप्त
सचेतस्त्वं प्रसन्नता॥

शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सुभाषितात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता, चारित्र्य (शील), संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य आणि प्रसन्नता. या सुभाषिताप्रमाणेच शीलवान, संस्कारक्षम, चारित्र्यसंपन्न शिक्षक म्हणजेच लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी, साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, अनेकांचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक गणपत शिर्के सर!

सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि काजळी नदीच्या काठावर वसलेल्या, स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या साखरपा-भडकंबा (ता. संगमेश्वर) गावी कै. मारुती शिर्के आणि कै. सत्यवती शिर्के या दांपत्याच्या पोटी ३ डिसेंबर १९६३ रोजी गणपत शिर्के यांचा जन्म झाला. कमावत्या वडिलांचे छत्र लहानपणीच हरविल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. तरीही त्यांच्या पाठी भक्कमपणे उभी राहिलेल्या आईने मोलमजुरी करून त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. त्यांची बहीण तारामतीने सातवीतून, तर दुसरी बहीण कमलने चौथीतून भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडून इतरांच्या घरी धुणी-भांडी आणि घरकाम केले. शिकण्याची त्यांची जिद्द आणि स्वाभिमानी असलेल्या आई-बहिणीच्या पाठिंब्यावर त्यांनी पुढे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

अकरावीकरिता त्यांनी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला. तेथील त्यावेळेचे मुख्याध्यापक आनंदराव कचरे सर यांनी गणपत शिर्के यांच्या परिस्थितीचा विचार करून आणि त्यांच्यातील प्रतिभा हेरून अकरावी-बारावीची दोन वर्षांची शाळेची फी माफ केली. पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च विद्यालयाने उचलला. १९८२ मध्ये ते ७६ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण झाले. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांध्ये बारावी कला शाखेत महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान त्यांनी मिळविला. मुख्याध्यापक आनंदराव कचरे सर यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोल्हापुरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. कमवा आणि शिका या योजनेतून पडेल ते काम करून इंग्रजी विषयात बी. ए. (प्रथम श्रेणी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तेथीलच महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयातून त्यांनी बी. एड.चे शिक्षण पूर्ण केले.

पुढे कोकणातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेत जून १९८७ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर आपल्या आयुष्यातील ३३ वर्षे त्यांनी या प्रशालेत समर्पित भावनेने सेवा करीत आहेत.

त्या काळी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असे. इंग्रजी विषय ग्रामीण भागातील मुलांना डोकेदुखीचा होत असे. पण शिर्के सर आपल्या प्रभावी अध्यापनकौशल्यामुळे इंग्रजी विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरले. एक जरठ शिक्षक वर्गात येऊन बौद्धिक घेतो असे कधी झाले नाही. रानात गेलेल्या आईची मुलांनी उंबर्‍यावर बसून वाट पाहावी, तसे विद्यार्थी त्यांची वाट पाहत असत. त्यांचे वर्गात येणे वीरनायकासारखे रुबाबदार असे. आवाज हळुहळू चढत गेला की वातावरण बदलून जाई. ब्रह्मकमळाच्या फुलासारखा क्षणकाल उमलणारा निखळ वर्तमान असा काहीसा अध्ययन-अध्यापनाचा तो आनंदोत्सव असतो. यामुळेच तर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ९८ टक्क्यांपर्यंत गुण मिळविण्यात यश मिळाले. त्यांनी इंग्रजी विषयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याचा सतत प्रयत्न केला.

तीन दशकांहून अधिकच्या या शैक्षणिक सेवेत त्यांनी ९ मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केले. प्रशालेच्या सर्व विभागांत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या संधीचे सोने करीत त्यांनी प्रामाणिकपणे हे विभाग चालविले. शाळेतील कोणत्याही स्पर्धा असोत वा सांस्कृतिक कार्यक्रम, शिर्के सर त्याचे उत्तम संयोजन करून ते यशस्वीरीत्या पार पाडत. त्यामुळे आपले सहकारी आणि विद्यार्थिवर्गात ते विशेष लोकप्रिय ठरले आहेत.

सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक या पदांवर आदर्शवत काम करून सर सन २०१८ मध्ये मुख्याध्यापकपदी विराजमान झाले. साने गुरुजींच्या विचारांचा वारसा चालविणार्‍या शिर्के सरांनी तालुक्यातील ग्रामीण भागात हजारो श्याम घडविले आहेत. गावोगाव, देश,परदेशात त्यांचे हे हजारो श्याम विखुरले आहेत. सरांच्या प्रेरणेने तेही समाजभान जपत घोडदौड करत आहेत. शिर्के सर मुख्याध्यापक झाल्याचे कळताच त्यांच्यावर प्रेम करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यावेळी एक सहकारी शिक्षक म्हणून आमचाही ऊर भरून आला. शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर गुरूचा सार्वकालिक ठसा उमटावा लागतो, तो उमटविण्यात शिर्के सर कमालीचे यशस्वी ठरले.

लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत विविध शालाबाह्य स्पर्धांमध्ये प्रशालेने अभूतपूर्व यश मिळविले. पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती, एन्. एन्. एम्. एस्. परीक्षेत आजपर्यंतचे सर्वाधिक विद्यार्थी, एन्.टी.एस्. या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येऊन विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश मिळविले. क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारांत राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी मजल मारली. सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या ऐलान युवामहोत्सवाचे अजिंक्यपद सलग दोन वर्षे प्रशालेने पटकाविले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक असलेल्या विविध उपक्रमांचा धडाका त्यांनी गेल्या दोन वर्षांत लावला. शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या सरांनी प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता सुभद्राबाई शिक्षण निधी या संस्थेशी संपर्क साधून प्रशालेच्या ३३ गरीब विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली.

नैसर्गिक संकटे माणसासाठी नवी नाहीत, परंतु गत दोन वर्षांत अनेक संकटांनी मानवासमोर नवी आव्हाने उभी केली. या पडत्या काळात शिर्के सरांमधील माणुसकीने ओतप्रोत भरलेला प्रगल्भ माणूस आम्हा सहकार्‍यांना पाहायला मिळाला. केरळ पूरग्रस्तांसाठी प्रशालेमध्ये तब्बल दीड लाखाचा निधी उभारून तो १५ डिसेंबर २०१८ रोजी केरळ सचिवालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाकडे त्यांनी सुपूर्द केला. या कामी त्यांचे मित्र सुभाष लाड यांनी मोलाची मदत केली. त्यांच्यामुळे जीवनात पहिल्यांदाच विमान प्रवास करता आल्याचे सांगत त्याचे श्रेय शिर्के सरांनी लाड सरांना दिले. पुलवामा हल्ल्यानंतरही एक लाख २५ हजारांचा निधी त्यांनी सैनिक कुटुंबांसाठी उभा केला. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दोन लाख ५१ हजारांचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असताना सुपूर्द केला. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीमुळे जीव गमविलेल्या कुटुंबीयांसाठी त्यांनी ३० हजाराचा निधी उभारला आणि चिपळूणच्या तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन तो निधी सुपूर्द केला. कारण मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याची प्रवृत्ती वाढत असताना हा सर्व निधी गोळा केल्यानंतर योग्य व्यक्तीच्या हाती तो देण्याची त्यांची तळमळ महत्त्वाचीच वाटते.

आज सार्‍या जगाला कवेत घेणार्‍या करोनाच्या संकटकाळातही त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न करता विविध सामाजिक संस्थांमध्ये वैयक्तिक स्तरावर ४० हजाराची देणगी दिली आहे. आपल्या आचरणातून समाजभान कसे जपावे, याचा आदर्श त्यांनी आपल्या सहकार्‍यांसमोर उभा केला आहे. मुख्याध्यापकांच्या आदर्श कार्यामुळे शाळा नावारूपाला येतात. लांजा हायस्कूलची ओळख स्वर्गीय पोवार सरांची शाळा म्हणून आजही जिल्हाभरात आहे. करडी शिस्त आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या पोवार सरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही. तरीही त्यांचे अनुकरणीय व्यक्तिमत्त्व सहकारी शिक्षकांकडून नव्याने दाखल झालेल्या शिर्के सरांना ऐकायला मिळाले. शिर्के सरांनी त्यांचा वारसा खर्‍या अर्थाने जोपासला आहे आणि म्हणूनच आपल्या कार्यशैलीने शिर्के सरांची शाळा म्हणून लांजा हायस्कूल आज आपली नवी ओळख बनविते आहे. हा शेरा सन २०१९ मध्ये लांजा हायस्कूलची अचानक तपासणी करून उत्कृष्ट शाळा असा प्रशंसापर शेरा मारणारे दस्तुरखुद्द रत्नागिरीचे उपशिक्षणाधिकारी गावंड साहेब यांनी २ फेब्रुवारी २०२० च्या रत्नागिरी येथील जिल्हा मुख्याध्यापक सभेमध्ये दिला. या सभेत जिल्ह्यातील अन्य मुख्याध्यापकांसमोर त्यांनी लांज्याच्या शिर्के सरांच्या शाळेत गेलो असता ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी एक अभिनव प्रयोगशाळा असल्याचे आणि तेथील प्रशासन उत्कृष्ट असल्याचे नमूद केले. तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक शिर्के सर सर्वच्या सर्व तास घेतातच. शिवाय उत्कृष्ट निकालाबरोबरच त्यांच्या अध्यापनात गुणवत्ता दिसल्याचे सांगितले. तसेच सर्व मुख्याध्यापकांनी त्यांचे अनुकरण करावे, असे आग्रहाने सांगितले.

शिर्के सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. त्यांचा स्वभाव मुळातच कार्यकर्त्याचा असल्यामुळे ते नेहमीच विविध कामांत व्यस्त असल्याचे पाहावयास मिळते. साखरपा या गावातील थोर समाजसेवक कै. आत्माराम शिंदे यांचा सहवास आणि प्रेरणेतून त्यांच्यामध्ये समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, ही भावना प्रबळ झाली आणि ते समाजहितासाठी वेळ खर्च करू लागले. साने गुरुजी सेवा मंडळ (भडकंबा), साने गुरुजी कथामाला, कै. नानासाहेब शेट्ये स्मारक समिती (साखरपा), श्री देव केदारलिंग, विठलाई मानाई नवलाई आणि श्री देव सोंबा देवस्थान, अपना बाजार, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई), माझी मायभूमी प्रतिष्ठान, लांजा तालुका कलाध्यापक संघ अशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. परमपूज्य साने गुरुजींचे विचार मुलांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्यावर योग्य संस्कार होऊन सुदृढ पिढी निर्माण व्हावी, या भावनेतून ते गेली ३३ वर्षे कार्यरत आहेत. खरे तर त्यांचे आयुष्य म्हणजे एक सप्तरंगी कोलाजच आहे. त्यातल्या अनेक तुकड्यांवर स्वतंत्रपणे लिहिता येईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच भावले आहे. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास, मुद्द्यांची अभ्यासपूर्ण मांडणी, खणखणीतपणा यांचा परिपाक असलेले त्यांचे वक्तृत्व, कणखर करारी नेतृत्वशैली, सर्वसामान्यांमध्ये सहजपणे मिसळण्याची वृत्ती, सरळमार्गी स्वभाव त्यांच्याविषयी मनात आदरभाव निर्माण करतो.

शिक्षकांच्या सुखदु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बळ देणार्‍या शिर्के सरांनी शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या माध्यामातून अनेक अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. शिक्षकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी सहकारी आत्माराम मेस्त्री सरांसोबत शिर्के सरांनीही विचारांच्या तत्त्वांसाठी संघर्ष केल्याचे सार्‍यांनाच ज्ञात आहे.

नवीन पिढीने राष्ट्र उभारणीसाठी सर्वस्व वेचले पाहिजे, या विचारांवर ठाम असलेल्या शिर्के सरांनी माझ्यासारख्या अनेक नवोदित, काम करण्याची इच्छा असणार्‍या तरुणांना आपल्या विविध संस्थांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. गेली सहा वर्षे राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) ग्रामीण भागातील नवोदित कवी-लेखकांना व्यासपीठ मिळावे, ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, या हेतूने लांजा आणि राजापूर तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजन करत आहे. हा उपक्रम आज कोकणासह महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वेसर्वा सुभाष लाड यांच्या बरोबरीने शिर्के सरांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.

गेली ३३ वर्षे आत्मभान, समाजभान आणि राष्ट्रभान जपत समाजवादी विचारसरणीचे पाईक राहून निरपेक्षपणे केलेल्या कामात त्यांनी कोणताही अट्टहास धरला नाही वा मोहही मनाशी बाळगला नाही. त्यामुळेच ते आदर्श शिक्षक या व्याख्येत परिपूर्ण बसतात. त्यांच्या या आजवरच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन आजवर विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या या यशात आईचे आणि दोन्ही बहिणींचे योगदान ते महत्त्वाचे मानतात. बहिणींनी त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्यागामुळे बहिणींच्या अडीअडचणीत ते धावून जातात. त्यांची पत्नी सौ. रोहिणी या शिक्षिका असून नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या सांॉभाळत त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले आहे. त्यामुळेच मृण्मयी आणि समीक्षा या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना साकार करू पाहत आहेत, तर मुलगा दुर्वेशही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. अनेक संस्थांमध्ये कार्यरत असल्यामुळे घराकडे फार वेळ देता येत नाही, याची उणीव सौ. रोहिणी शिर्के यांनी कधीही जाणवू दिली नाही. पत्नीच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच आपण सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी वेळ देऊ शकलो, असे सर आवर्जून सांगतात.

आजच्या बदललेल्या शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधांतही विद्यार्थ्यांचा ओघ प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप आणि समृद्ध विद्यार्थी घडविणारी शिर्के सरांसारखी आदर्श व्यक्तिमत्त्वे. मला आजही आठवतो, तो लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदाची धुरा हाती घेतल्यानंतरचा सरांचा पहिला वाढदिवस. त्या दिवशी सकाळपासून सरांना आदर्श मानणारे विद्यार्थी आणि हितचिंतकांची प्रशालेत गर्दी होती. समाजाच्या जडणघडणीतील शिक्षकाचे स्थान ती गर्दी अधोरेखित करत होती.

आजच्या ऐहिक जगात आयुष्याचा खरा मार्ग सापडलेले आणि खरे मार्गदर्शन करणारे सच्चे गुरू विरळाच. कोणतीही अपेक्षा न करता सर्वसामान्यांना मार्गदर्शन करणारे शिर्के सरांसारखे गुरू मिळणे तर अशक्यच. असे गुरू मिळणे खरोखरच भाग्याचे. हे भाग्य माझ्यासारख्या अनेकांना मिळाले, हे आमचे सुदैवच. आई जन्म देते पण शिक्षकच आपल्याला जगणे शिकवितो. आपल्यामध्ये योग्य आदर्श संस्कार, नीतिमूल्ये आपला नैतिक, मानसिक, चारित्र्यात्मक विकास घडवून आणतो. असेच आपणा सर्वांच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारे आणि तेजोमयी विचारांकडे नेणारे लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिर्के सर यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य प्रदीर्घ, निरामयी, आनंददायी होवो, हीच शुभकामना व्यक्त करतानाच शिर्के सरांमधील ध्येयवेड्या शिक्षकाला मन:पूर्वक दंडवत!

गणपत शिर्के सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान
१) इंग्रजी विषयाचा अध्यापक म्हणून ३३ वर्षे उत्कृष्ट काम
२) दहावी परीक्षेचा इंग्रजी विषयाचा सतत१०० टक्के निकाल
३) इयत्ता दहावी परीक्षेसाठी परीक्षक म्हणून १२ वर्षे काम
४) मार्च २०१८ पासून इंग्रजी विषयाचे प्रमुख नियामक.
५) कोकण विभागीय मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी इंग्रजी विषयासाठी विभागीय प्रशिक्षणार्थी आणि दि.१ आणि २ जुलै २०१३ रोजी रत्नागिरी येथे अवेअरनेस रेझिंग प्रोग्रामसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक.
५) एस्. एस्. सी परीक्षा मार्च २०१९ साठी आणि मार्च २०२० साठी पेपर सेटर म्हणून नाशिक आणि लातूर येथे विभागीय मंडळात काम.

शिर्के सरांना मिळालेले पुरस्कार
१) न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचा सन २००३-०४चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
२) साने गुरुजी कथामाला, रत्नागिरी सन २००९ चा जिल्हास्तरीय कथामाला पुरस्कार
३) अ. आ. देसाई गौरव निधी ट्रस्टचा सन २०१२-१३चा जिल्हास्तरीय गुरुवर्य पुरस्कार
४) राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा बॅरिस्टर नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
५) विश्व समता कलामंच, संगमेश्वर या संस्थेचा राज्यस्तरीय विश्वसमता विशेष पुरस्कार
६) प्राचार्य एम. पी. पिल्लई आदर्श शिक्षक पुरस्काराने सन २०१७ मध्ये केरळ येथे सन्मानित
७) लांजा तालुका पत्रकार संघाचा पै. एस्. वाय. रखांगी आदर्श शिक्षक पुरस्कार
८) फ्रेंड्स रत्न पुरस्कार सन २०१८
९) संस्कृती फाउंडेशनचा संस्कृती सन्मान पुरस्कार सन २०१८-१९
१०) न्यू एज्युकेशन सोसायटीचा कै. श्रीकृष्ण पर्शराम शेट्ये स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१८-१९
११) संदीप स्मृती मंडळाकडून विशेष सन्मान सन २०१९

  • विजय हटकर
    सहाय्यक शिक्षक
    न्यू इंग्लिश स्कूल आणि
    तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा
    (संपर्क : ८८०६६३५०१७)

(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या शुक्रवार, ३१ डिसेंबर २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply