मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध परिपत्रकात ही माहिती देण्यात आली असून, बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा 50 करण्यात आली आहे.
परिपत्रकात असंही नमूद करण्यात आलं आहे, की अंत्यसंस्कारांसाठी उपस्थितांची मर्यादा आता जास्तीत जास्त 20 असेल. त्याचप्रमाणे राज्यातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, क्रीडांगणे यांसारख्या जास्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास 24 डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) 144 सीआरपीसी लागू करता येईल. याशिवाय आधीच्या आदेशाप्रमाणे लागू असलेले सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील, असे कळवण्यात आले आहे.
राज्य सरकारचे सविस्तर आदेश सोबत दिले आहेत.
