रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या शिवशाहीर चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत संदीप दिवे (पुणे) आणि केशर निर्गुण (सिंधुदुर्ग) विजेते ठरले.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने पुण्याच्या सागर वाघमारेचा तीन सेटमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत २५-१४, १०-१८ व १५-५ असा पराभव करत शिवशाही चषकावर आपले नाव कोरले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच अंतिम प्रवेश केलेल्या सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला २५-३, २५-१४ असे सहज पराभूत करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी पुरुष एकेरी गटातील उपांत्य सामन्यात संदीप दिवेने मुंबई उपनगरच्या महम्मद यासिन शेखला ९-२५,२५-१० व १९-१७ असे पराभूत केले होते. दुसरीकडे पुण्याच्या सागर वाघमारेने रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीला २३-२, २५-१९ असे पराभूत केले होते. महिला एकेरी गटाच्या तिसऱ्या उपांत्य लढतीत केशर निर्गुणने रत्नागिरीच्या मैत्रेयी गोगटेला १५-१८, १८-१२ व २५-११ असे नमविले होते. दुसऱ्या सामन्यात आकांक्षा कदमने पालघरच्या श्रुती सोनावणेला २५-०, १२-२० व २५-८ असे हरविले होते.
खासदार विनायक राऊत मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, उपाध्यक्ष अरुण केदार आणि शांताराम गोसावी, रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.


