रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी आज झालेल्या निवडणुकीत सुमारे ६३ टक्के मतदान झाले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३७ जागांसाठी दोन पॅनेलचे मिळून ६६ उमेदवार आमने सामने होते. दिवसभरात १०७३ मतदारांपैकी ६७३ सभासदांनी (६२.७२ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. उद्या (दि. १६ मे) सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी तीनच्या दरम्यान संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
सोसायटीच्या एकूण ३७ पदांसाठी ६६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अरुअप्पा जोशी पॅनेल विरुद्ध संस्था पॅनेल अशी ही निवडणूक आहे.
अध्यक्ष, कार्यवाह आणि सहकार्यवाहपदाच्या प्रत्येकी एका पदासाठी प्रत्येकी २, उपाध्यक्षपदाच्या ३ जागांसाठी ५, विश्वस्तपदाच्या ३ जागांसाठी ६, सल्लागार मंडळाच्या १० जागांसाठी १४, नियामक मंडळाच्या १८ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मकरंद साखळकर काम पाहत आहेत.


