रत्नागिरीतील कलाकारांची निर्मिती असलेले विठ्ठलभक्तिगीत प्रसारित

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील श्री स्वामी समर्थ अॅडव्हर्टाइजमेंट आणि क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने आगळ्या वेगळ्या रूपातील विठुरायाचे भक्तिमय गीत सादर करण्यात आले.

या गाण्यात पारंपरिक आणि पाश्चात्य संस्कृतीचा उत्तम मिलाफ आहे. रत्नागिरीतील रत्नभूमी क्रिएशन ग्रुप गेली अनेक वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी एकाहून एक सरस नाटके या संस्थेने सादर केली. यावर्षी या ग्रुपने श्री स्वामी समर्थ अॅडव्हर्टाइजमेंट या या कंपनीची स्थापना करून त्यायोगे पहिल्याच प्रयत्नात क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रॉडक्शनच्या साथीने गीत तयार केले आहे. उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक राजेश मापुसकर यांच्या हस्ते या गाण्याचे प्रकाशन हॉटेल सी फॅन्स येथे करण्यात आले. आज आषाढी एकादशीला हे गाणे रसिकांना आणि विठू भक्तांकरिता यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करण्यात आले.

या गीताचे लेखन आणि दिग्दर्शन ओंकार पंडित यांचे असून युवा संगीतकार पंकज घाणेकर यांनी या गीताला खास शैलीत संगीतबद्ध केले आहे. छायाचित्रीकरणाची जबाबदारी तरुण कलावंत ओम कोळेकर यांनी पेलली असून गीताचे संकलन आणि सहायक दिग्दर्शन रत्नागिरीतील रंगकर्मी नंदू जुवेकर यांनी केले आहे. अमोल मयेकर कार्यकारी निर्माता आहेत. हे गाणे ८ गायक, ४ वादक आणि इतर १६ कलाकारांना घेऊन चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे चित्रीकरण स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, शिरगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील पुरंडवडे गोल रिंगणात केले आहे.

रत्नागिरीतील नामवंत वादक कलावंतांनी या गाण्याला आपापल्या परीने रंग चढवला असून अनोखा बाज असलेले हे गीत रसिकांना आवडेल, असा संस्थेला विश्वास आहे.

हे गीत सोबतच्या लिंकवर उपलब्ध आहे –

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply