कोल्हापूर : सिद्धगिरी कणेरी मठात झालेल्या सात दिवसांच्या मंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण जनजागृतीची व्यापक मोहिमेला चालना मिळेल, असा विश्वास उपक्रमाचे प्रमुख संयोजक समन्वयक विश्वस्त आणि महाराष्ट्र उद्योग आघाडीचे प्रमुख उदय सामंत यांनी व्यक्त केला.
गेल्या २० फेब्रुवारीपासून मंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंत, साधूगण, प्रयोगशील कार्यकर्ते, शेतकरी यांच्या विचारमंथनातून पर्यावरणविषयक जनजागृतीची आणि कृतीशील विविध उपक्रमांची सुरुवात होईल. हेच या कार्यक्रमाचे यश आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेला गाव, तालुका पातळीवर कृतीशील समर्थन मिळेल. गेले सात दिवस सुरू असलेल्या या उपक्रमामध्ये झालेल्या विविध चर्चासत्रांतून देशातील शास्त्रज्ञ, विविध राज्यांचे राज्यपाल तसेच विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध मंत्री, बरोबरीने प्रयोगशील शेतकरी आणि थेट बांधावर काम करणारे कल्पक युवावर्ग या सर्वांच्या वैचारिक मंथनातून पर्यावरण जागृतीचा एक समान धागा दिसून आला आहे. सर्वच वक्त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर सातत्य राहावे, असे उपक्रम द्यावेत असे सूचित केले आहे. हेच या कार्यक्रमाचे यश आहे. या सात दिवसांत व्यक्त झालेल्या विचारांचे पुस्तक रूपात संकलन करण्यासह या संदर्भात विविध शिक्षण संस्थांमधून पदवी, पदविका पंचमहाभूत सजगता अभ्यासक्रम सुरू व्हावा, समाजातील सर्व स्तरांपर्यंत जनजागृतीचे सातत्याने कार्यक्रम नियोजन करण्यासाठी सिद्धगिरी मठ आपली मुख्य समन्वयकाची भूमिका बजावत राहील, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
लाखोंच्या संख्येने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

