दापोली : दापोली सायकलिंग क्लबच्या चौघांनी अंधेरी (मुंबई) ते दापोली असा २५० किलोमीटरचा प्रवास सायकलने करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती केली.
कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून चाकरमानी गावी पोहोचतात. त्यासाठी वेगवेगळ्या वाहनांची निवड केली जाते. दापोली सायकलिंग क्लबच्या चौघा सदस्यांनी सायकलची निवड केली. आंबवली गावातील सूरज भुवड आणि किरण भुवड, लाडघर येथील अजय मोरे आणि कोळथरे गावातील यश भुवड नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला असतात. तेथून ते गणेशोत्सवासाठी गावी पोहोचले. हा २५० किमीचा सायकल प्रवास यश आणि किरण या दोघांनी १६ सप्टेंबर २०२३ रोजी आणि अजय आणि सूरज यांनी १९ सप्टेंबर रोजी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग मुंबई अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरू झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला.
या सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पागोष्टी झाल्या. पर्यावरणपूरक गणपती उत्सवाचा संदेश घेऊन निघालेल्या या चौघांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे सर्व शीण काही क्षणातच नाहीसा झाला आणि आणखी स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे चौघेजण सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. ऑफिस आणि बाजारात जाण्यासाठी ते अनेक वेळा सायकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहिले आहे. अनेक वर्षांपासून ते आजारी पडलेले नाहीत. गणपती बाप्पाची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी सुखरूप झाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

