रत्नागिरी : कारगील युद्धातील ब्रिगेडिअर एस. व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या दोघा योद्ध्यांच्या तोंडून युद्धकथा ऐकून अनेक विद्यार्थ्यांचे सैन्याविषयीचे कुतूहल जागृत झाले.
लक्ष्य फाउंडेशनच्या प्रमुख सौ. अनुराधा प्रभुदेसाई यांनी या दोघा योद्ध्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून त्यांनी युद्धातील रोमांचक प्रसंग जिवंत केले. फाउंडेशनने मेरा देश मेरी पहचान या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीत केले होते. त्यावेळी मुलाखतीचा हा कार्यक्रम झाला. हजारो विद्यार्थ्यांना या मुलाखतीने मंत्रमुग्ध केले.
जम्मू आणि काश्मीरमधील तसेच समुद्रसपाटीतून १९००० फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगीलचे युद्ध भारताने वीर जवानांमुळे जिंकले. टायगर हिल, तोलोलिंग, काकसर, कारगील, जुबर, खालुबर, रॉकी नॉक आणि अन्य चौक्यांवर पाकिस्तानने कब्जा केला होता. त्यावर केलेल्या प्रतिहल्ल्याचे युद्ध तीन महिने चालले. अखेर युद्धात भारताने पाकवर विजय संपादन केला. आपले अनेक जवान शहीद झाले. या कारगील युद्धाची कथा ब्रिगेडिअर भास्कर आणि कॅप्टन अढाऊ यांच्या तोंडून ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकर विद्यार्थ्यांना मिळाली.
प्रमोद महाजन क्रीडांगणावर चार हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, एनसीसी कॅडेट्स व रत्नागिरीकरांची कार्यक्रमाला गर्दी झाली होती. डॉ. अढाऊ मूळचे अमरावतीचे. त्यांनी या युद्धात जवळपास १०८ जखमी सैनिकांना जीवदान दिले. कॅप्टन विक्रम बात्रा व अन्य जवानांना आपण वाचवू शकलो नसल्याचे दुःख त्यांना वाटते. रक्तबंबाळ जखमी सैनिकांना वाचवण्याकरिता ऑपरेशन, सलाइन लावणे, औषध गोळ्या देणे हे काम केल्याचे सांगताना ते भावुक झाले. युवकांना संदेश देताना डॉ. अढाऊ म्हणाले की, मी स्वतःसाठी काय केले यापेक्षा देशासाठी आपण काय केले याचा विचार करा. आपल्या पायाखाली येणारा प्लास्टिक कचरा गोळा करा. स्वतः कुठेही प्लास्टिक रॅपर्स, पिशव्या टाकून कचरा करू नका. समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे मासे, जलचरांना व पर्यायाने आपल्याला धोका पोहोचत आहे.
आर्मीचे कठीण प्रशिक्षण, एलओसी कारगील चित्रपटातील काही क्षणचित्रे यावेळी दाखवून त्यावेळचे प्रसंग ब्रिगेडिअर भास्कर यांनी सांगितले. रेडिओ सेटवरून बोलावे लागते. त्या वेळी संदेश देताना वापरण्यात येणारे कोडवर्ड कसे असतात याबाबत त्यांनी सांगितले. शत्रूला कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू नये म्हणून हे करावे लागते. युद्धामध्ये सैनिकांचे मनोबल वाढवण्याचे काम करावे लागते. आपल्याला पुढे जात राहायचे आहे. आर्मीत आपण याकरिताच आलो होतो, आर्मीचे अपयश म्हणजे देशाचे अपयश. परंतु आम्ही यश मिळवल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. भारतीय सैनिकच देशसेवा करतात असे नाही तर सर्व भारतीय देशासाठी काम करत आहेत. जबाबदारीने काम पूर्ण करा, देशाचे कायदे, नियम पाळा, कोणीही लहान-मोठा असू दे. त्याचा आदर करायला शिका. तेव्हा सर्वांनाच आदर मिळेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, सुहास ठाकूरदेसाई, राजेश आयरे, नंदू चव्हाण, माजी सैनिक मोहन सातव, शंकर मिलके, विजय आंबेरकर, राकेश नलावडे यांच्यासमवेत सर्व माजी सैनिक,सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी केल्याबद्दल अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमात सतत भारतीय सैन्यासाठी टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. सुनियोजित कार्यक्रम आणि बैठक व्यवस्थेमुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला रत्नागिरीतील ३० माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता उपस्थित होत्या.


