रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत आज (शुक्रवारी) प्रत्येकी नवे ६ करोनाबाधित आढळले. रत्नागिरीत २७, तर सिंधुदुर्गात १४ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत २, तर अँटिजेन चाचणीनुसार खेड, संगमेश्वर, लांजा आणि राजापूरमध्ये प्रत्येकी १ असे चार रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ९५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ४२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर सर्वाधिक ३२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार २१२ झाली आहे.
जिल्ह्यात आज २७ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ७५५ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.०४ टक्के आहे.
जिल्ह्यात आज खेडमधील ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२९ असून जिल्ह्याचा मृत्युदर पुन्हा वाढून ३.५७ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार कोव्हीड-१९ च्या १४ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५११ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ८८७ एवढी झाली आहे. आज कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १५७ एवढीच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

