रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (शनिवारी) प्रत्येकी ३ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ८५१ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.९४ टक्के आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याने करोनामुक्तीचा दर आज घटला आहे.
जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार ८, तर अँटिजेन चाचणीनुसार नवे १३ रुग्ण आढळले. त्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी आणि राजापूर प्रत्येकी १, चिपळूण ६, रॅपिड अँटिजेन चाचणी – दापोली आणि खेड प्रत्येकी ६, देवरूख १.(दोन्ही मिळून २१). एकूण रुग्णांची संख्या आता नऊ हजार ३२२ झाली आहे. आज आणखी १८४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार ५७० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आज चिपळूण तालुक्यातील एका ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३४ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५८ टक्के झाला आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज ३ जणांनी कोरोनावर मत केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५८९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ९७० एवढी झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

