रत्नागिरी : जिल्ह्यात आज (दि. २९ नोव्हेंबर) करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले, तर २ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ४७वरून आज ५३वर आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ३७ वर आली होती.
आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ९३ झाली आहे. आज २ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५५५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.७९ आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २५३ पैकी २४५, तर रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या सर्व १६५ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आठ आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३३ हजार ६०३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात ५३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले २३, तर लक्षणे असलेले ३० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २३ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ३० जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १२, तर डीसीएचमध्ये १५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर, २ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४८५ आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७३, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२७, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४८५).
लसीकरणाची स्थिती
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले, की नागरिकांनी जिल्ह्यात लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पहिली लस घेणाऱ्यांचे प्रमाण ८८ टक्के, तर दोन्ही लस घेणाऱ्यांचे प्रमाण ४८ टक्क्यांपर्यंत आहे. ज्यांनी पहिली लस घेतली नाही त्यांनी ती तत्काळ घ्यावी. सर्व लसीकरण केंद्रावर लशींची उपलब्धता असून, नागरिकांनी कुठलाही विलंब न करता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या ६० लसीकरण सत्रांत १०२० जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला, तर ३८२६ जणांनी दुसरा डोस घेतला. २७ नोव्हेंबरपर्यंतच्या एकूण स्थितीनुसार, जिल्ह्यातील ९ लाख ४८ हजार ५७३ जणांनी पहिला, तर ४ लाख ५४ हजार १९५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा प्रकारे एकूण १४ लाख २ हजार ७६८ जणांचे लसीकरण झाले आहे.