रत्नागिरी : समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील व्यवस्थापनाच्या काही युक्ती समजून घेण्याची संधी कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांना रत्नागिरीत उपलब्ध होणार आहे. मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणीची मुदत आज, १० जानेवारीपर्यंतच आहे.
केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांचा मेळावा येत्या १४ आणि १५ जानेवारीला रत्नागिरीत होणार आहे. याच मीटमध्ये दासबोधातील मॅनेजमेंटची सूत्रे कीर्तनाच्या माध्यमातून उलगडली जाणार आहेत.
कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक तसेच व्यावसायिक देवाणघेवाण करणे आणि त्यातून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देणे या उद्देशाने कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन ही संस्था काम करते. रत्नागिरीत या संस्थेचे कार्य गेली पाच वर्षे सुरू आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक ज्ञातिबांधवांच्या व्यवसाय-उद्योगाला चालना मिळावी, यासाठी त्यांचा व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे विविध उपक्रम, त्यातून होणारे व्यावसायिक लाभ याची माहितीही यावेळी मिळेल. नेहमीचा व्यवसाय करताना व्यावसायिकांनी इतर व्यवसायांकडेही वळावे, या दृष्टिकोनातून कनेक्ट टू रिज्युविनेट या संकल्पनेवर या वर्षीचा मेळावा आधारलेला आहे. नवे विचार, वेगवेगळ्या संकल्पना, नव्या कल्पना आणि आपल्या व्यवसायाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. पहिल्या दिवशी, १४ जानेवारीला सायंकाळी ४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. दासबोधातून प्रकट होणाऱ्या व्यवस्थापनाच्या सूत्रांची हसत खेळत ओळख करून देणारे समीर लिमये यांचे कॉर्पोरेट कीर्तन हे या मेळाव्याचे खास आकर्षण आहे.
काय आहे कॉर्पोरेट कीर्तन?
संत वाङ्मयातील विचारधन नव्या स्वरूपात सादर केले तर तरुण पिढीला भावते. त्यातील मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या उपयोगी पडते, हे लक्षात घेऊन कल्याण येथील तरुण अभियंता समीर लिमये दासबोधावर आधारित कॉर्पोरेट कीर्तन सादर करतात. मनोरंजनातून लोकप्रबोधन करण्याची आपली जुनी परंपरा आहे. भारूड, फटका, गण, गवळण, कीर्तन यांमधून लोकांचे समाजभान जागृत ठेवण्याचे काम ही माध्यमे पूर्वीपासून करत आली आहेत. सध्याच्या काळात मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे आणि बदलल्यामुळे कीर्तन हा प्रकार तरुण त्याकडे पाठ फिरवितात. मग आपल्या संतांच्या काळातील विचार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचावेत, या विचाराने पछाडलेले समीर लिमये यातून मार्ग शोधत होते. स्वत: नाट्यक्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यामुळे आणि आपल्या बीटआर्ट या निर्मिती संस्थेद्वारे अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी फिल्म्स बनवताना येणारे अनुभव, चर्चा यातून त्यांना एक वाट दिसली. दासबोधाचा अभ्यास आणि सज्जनगडावरच्या भेटी एकीकडे सुरू असताना त्यांच्या एक लक्षात आले की कुठल्याही संघटनेची एक व्यवस्था, शिस्त असते. नियोजन असते. त्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन कार्यकर्ते, कर्मचारी करीत असतात. त्यांची तत्त्वे, नियमावली आणि त्याचे शिस्तबद्ध पालन यातून ती संस्था यशस्वी होते. सज्जनगडावरच्या समर्थ रामदासांनी घालून दिलेल्या ३५० वर्षे जुन्या तत्त्वप्रणालीवर आजही शिस्तबद्धपणे काम सुरू असते. मग या दोन्हीची सांगड घालता येईल का? कशी? विचार वेग धरू लागले. त्यांनी दिलेल्या दाखल्यातून आजच्या तरुणांना, कॉर्पोरेट जगात वावरतानाही विवेक, संयम यांची शिकवण किती लाभदायी आहे, हे सांगता येईल असे त्यांना वाटले. त्यासाठी कीर्तन हा प्रकार लोकांना कळेल, खूप आवडेल असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून मूळ कीर्तन तत्त्वाला धक्का न लावता सादर झाले ते कॉर्पोरेट कीर्तन. याच कीर्तनाचे “दासबोध आणि मॅनेजमेंट” हे आख्यान रत्नागिरीत होत असलेल्या केबीबीएफच्या ग्लोबल मीटमध्ये सादर केले जाणार आहे.
पर्यटन, आयटी क्षेत्र, घरगुती उद्योगांपासून मोठ्या हॉटेलपर्यंत कोणताही व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ज्ञातिबांधवांना या ग्लोबल मीटमध्ये सहभागी होता येईल. कनेक्ट टू रिज्यूविनेट अशी या ग्लोबल मीटची संकल्पना आहे. रत्नागिरीत टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये ही मीट होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधील कऱ्हाडे व्यावसायिक ज्ञातिबांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. मीटसाठी येऊ इच्छिणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी येत्या १० जानेवारीपूर्वी ऑनलाइन नोंदणीसाठी उमेश आंबर्डेकर (९८५००८२४३७), अमोल पंडित (९४२२०५२४६१) किंवा विनय टोळ्ये (८६०५९४८३२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या ग्लोबल मीटला जोशी बिल्डर्स अँड रिडेव्हलपर्स (कौस्तुभ कळके, ठाणे), पितांबरी उद्योग समूह (रवींद्र प्रभुदेसाई), ठाकूर फायनान्स सर्व्हिसेस (सदानंद ठाकूर, चिपळूण) आणि कैरी विश्रांती (अभय खेर, रत्नागिरी) यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
Follow Kokan Media on Social Media

