रत्नागिरीत केंद्रीय अर्थसंकल्पाचे २ फेब्रुवारीला विश्लेषण

रत्नागिरी : येत्या बुधवारी (दि. १ फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यातील बारकावे, अर्थकारणातील बदललेले सूक्ष्म, अतिसूक्ष्म घटक समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्याविषयी अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांचे विश्लेषणात्मक भाषण येत्या २ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात होणार आहे.

देशांतर्गत अर्थसंकल्प सादर केला जातो, तेव्हा देशातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत असतो. मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या चांगल्या-वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत, तसेत देशांतर्गत बदलणाऱ्या आर्थिक घडामोडींमधील बारकावे प्रत्येक नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे. यासाठीच गुरुवारी, २ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पावर मार्गदर्शन करण्यासाठी सोशिओ-इकॉनॉमिक तज्ज्ञ, व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दीपक करंजीकर यांची ‘अर्थक्रांतीचा राष्ट्रीय प्रवक्ता’ अशी खास ओळख असून ते सुप्रसिद्ध समाजशास्त्र व अर्थतज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि वक्ते आहेत. देशातील ‘सेल्स’ आणि ‘मार्केटिंग टीम्स’ चे नेतृत्व त्यांनी केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्पांचे यशस्वी व्यवस्थापनही त्यांनी केले आहे. अमेरिकेत वॉलस्ट्रीटच्या कार्यपद्धती, आर्थिक दहशदवाद, तेल आणि त्याचे राजकारण, अमेरिकन धोरणे, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना यांचा त्यांचा सखोल अभ्यास असून त्याबाबत त्यांनी विस्तृत लेखनही केले आहे. ‘आजच्या विश्वाचे आर्त’ आणि ‘घातसूत्र’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. अशा अनुभवी तज्ज्ञ व्याख्यात्याच्या खास अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ रत्नागिरीतील वाणिज्य क्षेत्राशी निगडीत व्यक्ती, संबंधित क्षेत्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच जागृत व सुजाण नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply