चित्पावन ब्राह्मण मंडळाचे वार्षिक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मंडळाच्या नव्वदाव्या वर्धापनदिनी सोमवारी, २७ मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मंडळातर्फे (कै.) सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार सौ. माधवी मनोहर भिडे (संगमेश्वर), सौ. अमृता अजित करंदीकर (रत्नागिरी) आणि सौ. सई अरुण ओक (गुहागर) यांना देण्यात येणार आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील अध्यापक जयंत विनायक अभ्यंकर यांना देण्यात येईल. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार चिपळूणच्या सायकलपटू सौ. धनश्री श्रीनिवास गोखले आणि डॉ. अश्विनी तेजानंद गणपत्ये यांना जाहीर झाला आहे.

थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी पुत्र समशेर बहाद्दर पुरस्कार कॅडेट सिद्धांत राजू पाटील (गुरुवर्य दादोजी कोंडदेव, सैनिकी शाळा, तासगाव) याला, चित्पावन मंडळाच्या (कै.) ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी देवेश प्रकाश जोग याला आदर्श विद्यार्थी आणि मंडळाच्या (कै.) सौ. आनंदीबाई त्रिविक्रम केळकर मुलींच्या वसतिगृहातील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मनाली संजय जोशी हिला देण्यात येणार आहे. मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक आणि शांतादुर्गा गॅस एजन्सीचे संचालक भीमसेन रेगे यांना जाहीर झाला आहे. युवा गौरव पुरस्कार हवाईसुंदरी झाल्याबद्दल ऋतुजा शैलेश मुकादम, कुमारगौरव पुरस्कार अल्पावधीत ऑर्गनवादनात प्रावीण्य मिळवणाऱ्या श्रीरंग हेरंब जोगळेकर याला जाहीर झाला आहे.

याशिवाय मंडळाचे सहकार्यवाह अनंत आगाशे यांच्या यशोगाथा पुस्तकाबद्दल, मंडळाच्या कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य यांची कन्या प्राजक्ता सीए झाल्याबद्दल आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सीए मुकुंद मराठे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. सातत्याने पर्यटन परिषदा घेऊन काम करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेला मंडळातर्फे अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

कार्यक्रमात गणित व संस्कृतमधील गुणवंतांना लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पारितोषिके, समाजशास्त्र व मराठीतील गुणवंत विद्यार्थ्यांना कै. केशव अच्युत व कै. सुलोचना केशव जोशी पारितोषिके दिली जाणार आहेत. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार आणि विविध वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. कै. सत्यभामाबाई फडके निधीतून एका महिलेस अर्थसाह्य करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. समशेरबहाद्दर पुरस्कार प्रशस्तीपत्र आणि ५००० रुपये, सन्मानपत्र असे स्वरूप आहे. महिला पुरस्काराचे स्वरूप साडी, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे.

येत्या सोमवारी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ७ या वेळेत मंडळाच्या जोशी पाळंदमधील श्री भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. समारंभात जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

पुरस्कारार्थी

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply