रत्नागिरी : येथील अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे साईराज पाथरे आणि मानसी लाड हे आणखी दोन विद्यार्थी पोलीस भरतीत निवडून आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीमध्ये यावर्षीच अकादमीच्या ३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आता आणखी दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. साईराज रघुनाथ पाथरे याची सोलापूर जिल्हा एसआरपीएफ दलामध्ये तर मानसी मनोज लाड हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.
साईराज पाथरे यांनी रत्नागिरी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती पण त्यांची संधी निवड निव्वळ एका गुणाने हुकली होती. अभ्यासातील सचोटी व सातत्य राखत अजिबात हार न मानता अभ्यासाबरोबरच प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर सोलापूर जिल्हा एसआरपीएफमध्ये निवडून येत त्यांनी यश संपादन केले. अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीने पोलीस भरतीसाठी स्वतंत्र बॅच घेतली होती. त्यामध्ये भरतीसंदर्भात सर्व विषयांचे मार्गदर्शन केले होते. त्या मार्गदर्शनाचा फायदा घेत या विद्यार्थ्यांनी यावर्षी देदीप्यमान यश मिळवले.
दरवर्षी अकादमी नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करते. प्रत्येक वर्षी अकादमीचे विद्यार्थी नेट व सेट परीक्षेत उत्तीर्ण होत आहेत. यावर्षी जून २०२३ मध्ये यूजीसीकडून घेण्यात आलेल्या नेट परीक्षेमध्ये अकादमीचे तेजस कळंबटे यांनी इतिहास विषयातून नेट परीक्षा देत नैपुण्य मिळवले आहे. अकादमीतर्फे या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


