दापोली : कागदी पिशवी दिनानिमित्ताने प्लास्टिक कॅरिबॅगऐवजी कागदी पिशवी अथवा कापडी पिशव्यांचा आवर्जून वापर करावा, असे आवाहन दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी १२ जुलै हा दिवस ‘जागतिक पेपर बॅग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कागदी पिशवी दिनापासून प्लास्टिक कॅरिबॅगचा त्याग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे हा कागदी पिशवी साजरा करण्याचा उद्देश आहे. फ्रान्सिस ओले यांनी १२ जुलै १८५२ रोजी पहिली कागदी पिशवी बनवली होती. त्यात सुधारणा करत १८७० मध्ये मार्गारेट किंग यांनी किराणा नेता येईल अशी कागदी पिशवी बनवली होती. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारले नाही. त्याने आपले आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून देऊन कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे. सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे, पण दुर्दैवाने सरकारसह कोणालाच त्याचे गांभीर्य उमजले नाही. ही बंदी दीर्घकालीन परिणाम पाहता समाजाच्या हिताचीच आहे.
कागदी पिशव्या हानिकारक प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय आहेत. ते लक्षात घेऊन आजच्या दिवशी सर्वांनीच अशी प्रतिज्ञा करावी की मी फक्त पेपर बॅगच अथवा कापडी पिशवीचाच वापर करीन, असे आवाहन निवेदिता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२४३०२१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

