
रत्नागिरी : ‘कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेचे कामकाज चांगल्या रीतीने सुरू आहे. ब्राह्मण व्यक्तींना एकत्र ठेवून सर्व समाजाचे हित साधणारी ही संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेला आतापर्यंत जसे सहकार्य केले त्याप्रमाणे कधीही संस्थेच्या मदतीसाठी सदैव सोबत आहे,’ असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव तथा भाजप तालुका सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले. नाचणे येथील यशवंत हरी गोखले भवनात १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वसंतोत्सव स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी फडके यांच्यासह आशादीप संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर, नाचणे येथील नवलाई ग्रुपचे जितेंद्र सावंत आणि कामगार नेते लिलाधर भडकमकर यांना सन्मानित करण्यात आले. या सत्कारमूर्तींनी ब्राह्मण संस्थेने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ब्राह्मण व्यक्तींचे मार्गदर्शन, सहकार्य लाभल्यामुळेच प्रगती करता आली, संस्थेचा हा उपक्रम खूप स्तुत्य व अनुकरणीय आहे, असे आवर्जून सांगितले. (मान्यवरांचे मनोगत आणि सत्कार समारंभाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

कार्यक्रमाला अध्यक्ष अनंत आगाशे, उपाध्यक्ष रवींद्र इनामदार आणि सभासद उपस्थित होते. या वेळी महिलांनी चैत्रगौरी हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला. अध्यक्षीय भाषणात अनंत आगाशे म्हणाले, की गुढीपाडव्यानिमित्त वसंतोत्सव साजरा करताना आनंद होत आहे. ४०० सभासद व २०० देणगीदारांच्या मदतीने संस्था २२ वर्षे सुरू आहे. परशुराम केळकर, वैशंपायन, नातू काका आणि माझ्यासह अनेक जणांनी संस्था स्थापन करताना वाढत्या रत्नागिरीचा विचार केला आणि वरच्या (सड्यावर) भागात राहणाऱ्या ब्राह्मण ज्ञातीच्या व्यक्तींसाठी ही संस्था चालू केली. सभासद वाढू लागले व एकोपा निर्माण झाला. आधी किशोर नवाथ्ये यांच्या कार्यालयात कार्यक्रम होत होते. यशवंत हरी गोखले यांनी जागा दिल्यामुळे ही वास्तू निर्माण करता आली. वाचनालय, अभ्यासिका, अभ्यागत निवास, शैक्षणिक वर्गखोल्या आदी सुविधा तयार करायच्या असून, सर्वांच्या सहकार्याशिवाय त्या निर्माण करता येणार नाहीत. त्यामुळे सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनायक देशकुलकर्णी यांनी, तर सूत्रसंचालन सौ. गौरी जोशी यांनी केले. आभारप्रदर्शन खजिनदार विलास कुळकर्णी यांनी केले. कार्यवाह रवींद्र रानडे, सहकार्यवाह प्रसाद पटवर्धन, अदिती भावे यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, महिला मंडळी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. यानंतर गायक अभिषेक काळे व मुग्धा गावकर यांचा ‘अभंग नाट्यरंग’ हा कार्यक्रम रंगला.
यांचा झाला सत्कार
वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण करणारी दाम्पत्ये आणि वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थी – स्वानंदी दाते, दूर्वा आगाशे, शौनक गोखले, देवांग पटवर्धन, अनुष्का नानिवडेकर, कौशिकी नवाथ्ये, मुक्ता बापट, रीतिशा माईणकर, ऋचा दंडवते, मैत्रेयी देसाई, ब्रविम देसाई, आरव पुराणिक, स्पृहा पोंक्षे.
उल्लेखनीय कार्य – सौ. दीप्ती आगाशे, अनिल देवळे, ओंकार नवाथ्ये, विनायक बापट, सौ. प्राजक्ता दामले, सौ. मधुरा चिंचाळकर, अनिकेत कोनकर, श्रीकृष्ण जोशी, सौ. राधा देवळे. सौ. सौख्यदा वैशंपायन
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

