रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज (आठ जून) सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. ही मिनी बस शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला घेऊन येत होती. बसमधले ३१ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये १५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश असून, दोन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. (फोटो, व्हिडिओ बातमीच्या खाली दिला आहे.)
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये. त्यांनी पाली आणि संगमेश्वर इथून पर्याय मार्गांचा वापर करावा, असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अपघातस्थळावरून केलं. वायुगळती होत असल्याने वाहतूक सध्या त्या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रात्री साडेदहापर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरू झालेली नाही. महामार्गाजवळचं घर, बाग, गोठा आणि वाहनं यांचंही या अपघातात नुकसान झालं आहे. त्यात काही जनावरं जखमी झाली आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवा यंत्रणा दाखल झाल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड





