मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था आता कोल्हापूरलाही उपलब्ध होणार आहे. १८ ऑगस्ट २०२५पासून मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापूरला सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाजमाध्यमावर याबाबतची माहिती दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्गासह सहा जिल्ह्यांना या व्यवस्थेचा उपयोग होणार आहे. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ करण्याची बऱ्याच वर्षांची मागणी आहे. ती यामुळे काही अंशी पूर्ण होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करून दिली आहे. याबाबतचे राजपत्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५पासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल. या भागातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. अनेक वर्षे हा लढा चालला. सातत्याने ते यासाठी मला भेटायचे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्याला यश आले. मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा अशी तीन खंडपीठे होतीच. त्यांना आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे. भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवईजी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधेजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे. परिसरातील नागरिक, वकिलांचेही मन:पूर्वक अभिनंदन!’
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

