मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (७ ऑक्टोबर २०२५) रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी व मच्छिमारांच्या बोटींच्या नुकसानभरपाईसाठी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच इतर मंत्री उपस्थित होते. मच्छीमार बांधवांसाठी केलेल्या या तरतुदीबद्दल मंत्री नीतेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मच्छिमारांच्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या वेळी मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त मच्छिमारांना तातडीने मदत जाहीर करण्याचे निर्देश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात राणे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमारांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

