रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ‘महामार्गाच्या विकासासोबतच निसर्गाचा समतोल राखणं आणि या परिसराचं सौंदर्य वाढवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास होत असताना पर्यावरणाची हानी टाळणं किंवा ती भरून काढणं तितकंच गरजेचं आहे. महामार्ग तयार करताना ज्या झाडांची हानी झाली, त्याची भरपाई म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जात आहे. हा हरित महामार्ग करण्याचा शासनाचा निर्धार असून, सर्वांच्या सहकार्याने हा संपूर्ण परिसर अधिक सुंदर आणि हिरवागार बनेल,’ असा विश्वास सामंत यांनी या वेळी व्यक्त केला.
या उपक्रमावेळी बंड्याशेठ साळवी, अभिजित हेगशेट्ये, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळेकांटे गावाच्या सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि शरद कदम यांच्यासह तळेकांटे गावाचे ग्रामस्थ व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media

