रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.
टिळक जन्मभूमी स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून, आरती करून आणि गीतेतील अध्यायांचे पठण करून टिळकांना अभिवादन करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक आणि शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. सुनील गोसावी, प्रा. मकरंद दामले, उद्योजक भिडे कुटुंबीय, राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, आज भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करताना लोकमान्य टिळकांचे विचार प्रेरणादायी ठरतात. ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक उत्तरदायित्व, सांविधानिक मूल्यांवरील निष्ठा आणि राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याची वृत्ती हीच त्यांच्या विचारांची खरी परंपरा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, संशोधन, नेतृत्वगुण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा जो आग्रह धरण्यात आला आहे, तो लोकमान्यांच्या शिक्षणविषयक दूरदृष्टीशी सुसंगत आहे. कठोर परिश्रम, निर्भय नेतृत्व, सत्यासाठी संघर्ष आणि राष्ट्रसेवा हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली होती. त्यांचे विचार आचरणात आणणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, ज्ञानसाधना आणि उत्कृष्ट चारित्र्याचा संकल्प करू या.
कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, स्वातंत्र्य टिकवणे आपल्या हातात आहे. आपण एक राहिलो नाही तर दुसरे लोक स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रहित प्रथम लक्षात ठेवून स्वातंत्र्य टिकवणे आवश्यक आहे. देश मोठा होईल याचा विचार करावा. आपण देशासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने करावा.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

