रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय सेवा समितीतर्फे येत्या रविवारी दि. १४ ऑगस्ट) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अखंड भारताचे इंग्रजांनी १४ ऑगस्ट १९४२ रोजी तुकडे करून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती केली. तो दिवस आपल्या परिवाराच्या अखंड हिंदुस्थानाच्या विचारांच्या दृष्टीने धक्कादायक दिवस होता.. बघता बघता आपल्याला खंडित स्वातंत्र्य मिळून येत्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे होणार आहेत. देशभरात या अमृतमहोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साह आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवताना असंख्य देशभक्तांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेकांनी आपले रक्त सांडले. याच निमित्ताने संघ प्रार्थनेप्रमाणे राष्ट्राला परमवैभवापर्यंत नेण्यासाठी म्हणजेच अखंड राष्ट्राचे विचार जागृत ठेवण्यासाठी तसेच आपल्या तरुणांपर्यंत पोचवण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अमृतमहोत्सवानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी किमान ७५ पिशव्या रक्तसंकलन करण्याचा संकल्प केला आहे.
अखंड भारतासाठी हौतात्म्य पत्करलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांबाबत आदरभावना व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांनी सांडलेल्या रक्ताविषयी आदर व्यक्त करण्यासाठी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात सहभाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे शिबिर रत्नागिरीत झाडगाव येथे माधवराव मुळ्ये भवनात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. पूर्वनोंदणी करूनच या शिबिरात रक्तदान करणे शक्य होणार आहे. त्या नोंदणीसाठी सोबतचा गुगल फॉर्म भरावा, असे सूचित करण्यात आले आहे.
गुगल फॉर्मची लिंक अशी – https://forms.gle/Qm3CgtBVaKki8zqDA
Follow Kokan Media on Social Media

