रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने भगवान श्री परशुराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत परशुराम हा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. तो उद्या (दि. १६ डिसेंबर) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे.
परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेले दत्तमाहात्म्य, रामायण आणि महाभारत यातील परशुरामांच्या कथेवर आधारित नवीन गीते या कार्यक्रमामध्ये असून सर्व गीतांमधून भगवान श्री परशुराम यांच्या जीवनचरित्रातील ठळक घटनांचे वर्णन आहे. श्री परशुराम यांचे मातृप्रेम, चातुर्य, अन्यायाविरुद्धचा लढा, दानशूरता, नवनिर्मितीचा ध्यास अशा अनेक गुणांचा परिचय करून देणारा हा सर्वांग सुंदर कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि गीत लेखन तसेच निवेदन : वैभव दातार (मुंबई) यांचे असून संगीतकार, गायक आणि हार्मोनियम साथ मिलिंद करमरकर यांची आहे. त्यांच्यासोबत कु. स्वरजा करमरकर सहगायन करणार आहेत. त्यांना राजेंद्र दातार आणि कु. नीरज लेले तबलासाथ करणार आहेत.
रत्नागिरीतील ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी सायंकाळी होणार असून या विनामूल्य कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


