कोल्हापूर : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विचारांचा संग्रह असलेल्या या साहित्यकृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
कणेरी मठ परिसरात आज सुरू झालेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला.
पर्यावरण संवर्धनाच्या जागरासाठी सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा सांगड घालत स्वामीजींचे समाजाची उन्नती साधण्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचणार आहेत. स्वामीजींच्या विचारकार्यावर आधारित या पुस्तकामुळे पर्यावरण जागर, अध्यात्माचे महत्त्व, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून झालेला समाजाचा विकास हे सारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना नेहमी चांगल्या कामासाठी प्रवृत्त करेल, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.
पत्रकार गुरुबाळ माळी यांचे हे अकरावे पुस्तक आहे. अक्षर दालनने ते प्रकाशित केले आहे.


