लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या लांजा आणि राजापूर ग्रामीण शाखांनी वाटूळ दाभोळे मार्गानजीक १०० रोपांचे वृक्षारोपण केले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) ही संस्था रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील राजापूर आणि लांजा या दोन तालुक्यांच्या विकासासाठी स्थापन झाली आहे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेतर्फे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने, ग्रंथालय चळवळ, पर्यावरण, पर्यटन, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात रचनात्मक पद्धतीने सातत्यपूर्ण काम केले जात आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जातो. त्यामध्ये देशी वनस्पतींची लागवड करण्यात येते.
परंपरेनुसार यावर्षीही काजू, फणस, आंबा, पिंपळ, वड या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी कर्नाटकातील हुबळी येथील मेसर्स नायक आणि कंपनीने तयार केलेल्या गुणपत्तापूर्ण वाटूळ ते दाभोळे या राज्य मार्गाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी या मार्गावरील वाटूळ, व्हेळ, वाघणगाव, भांबेड या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या वृक्षारोपण मोहिमेत शंभर रोपे लावण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी कदम, दोन्ही ग्रामीण शाखांचे अध्यक्ष महादेव पाटील आणि किरण बेर्डे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खामकर, प्रगतिशील शेतकरी अमर खामकर, महेंद्र साळवी, विजय हटकर आदी मान्यवरांसह संघाचे सदस्य उपस्थित होते. लावलेल्या रोपांची जोपासना संघातर्फे करण्यात येणार असल्याचे महेंद्र साळवी यांनी सांगितले. संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

