रत्नागिरी : वर्षाराणी श्रीपत सावंत (वय ३४ वर्षे, रा. बहिरीची वाडी, निर्व्हाळ, ता. चिपळूण, जि. रत्नागीरी) हिला आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर देण्यात आली.
वर्षाराणीला वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराने अपंगत्व आले. हळूहळू अंगातली सर्व ताकद कमी कमी होऊ लागली. तोल जाऊ लागला. पायाचे सांधे दुखायला लागले. चालणेही कमी झाले. हातात काठी घेऊन चालावे लागत होते. तशा परिस्थितीतही तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता घराबाहेर पडता येत नाही. घरातल्या घरातच हळूहळू स्वत:ची कामे करते. बर्याच कामात आईची मदत लागते.
वडील श्रीपत गणपत सावंत निवृत्त सैनिक आहेत. आई नंदा श्रीपत सावंत गृहिणी आहे. मोठे दोन भाऊ आहेत त्यांची लग्न होऊन ते कामानिमित्त मुंबईत राहतात. गावी वर्षाराणी आणि तिचे आईवडीलच राहतात. वर्षाराणीला आता चालणे सहज शक्य नसल्याने घरातच बसावे लागते. तिला बाहेर दवाखान्यात ने आण करण्यासाठी व्हीलचेअरची गरज होती. तिच्या ओळखीच्या अशोक भुस्कुटे सरांनी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांची माहीती सांगितली. त्याप्रमाणे तिच्या घरच्यांनी श्री. नाकाडे यांच्याशी संपर्क साधून वर्षाराणीची संपूर्ण माहिती दिली आणि व्हीलचेअरची मागणी केली. त्यानुसार श्री. नाकाडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रत्नागिरीत पीडब्ल्यूडीमध्ये कार्यरत असलेल्या सौ. वैशाली नारकर यांनी त्यांचे वडील कै. मुकुंद राम गांधी यांच्या स्मरणार्थ व्हीलचेअर देणगीदाखल दिली.
व्हीलचेअर वाटप करताना सौ. वैशाली नारकर, भाऊ संकेत मुकुंद गांधी, तन्वी विश्वास खातू, आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे तसेच अशोक भुस्कुटे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

