सिंधुदुर्गात बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या सलग दुसऱ्या दिवशीही अधिक

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात नवे ६ रुग्ण आढळले आणि २६ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ फेब्रुवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर ९ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत २ आणि चिपळूणमध्ये ३ (एकूण ५), रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी १, तर दापोली आणि खेड तालुक्यातील प्रत्येकी २ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ११). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९८९४ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५८२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७८ हजार ३०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १५२ आहे. त्यातील सर्वाधिक २८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात, तर त्याखालोखाल २६ रुग्ण कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ३९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९३६५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६५ टक्के आहे. जिल्ह्यात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६४ एवढीच असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६८ टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संचारबंदीच्या वेळेत बदल

रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात बदल करण्यात आला आहे. आता संचारबंदी रात्री ९ च्या ऐवजी रात्री १० सुरू होणार आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गेल्या २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार हा बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यात संचारबंदीची वेळ रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. हा बदल आजपासून, २४ फेब्रुवारीपासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२४ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ६ करोनाबाधित आढळले, तर २६ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४११ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०६९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply