रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत करोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. आज (६ एप्रिल) रत्नागिरीत १३८, तर सिंधुदुर्गात ६९ नवे रुग्ण आढळले. शिवाय दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी दोघांच्या मृत्यूचीही नोंद झाली.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज जिल्ह्यातील मंडणगड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात रुग्ण आढळले नाहीत. आज ५८ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९, दापोली १, खेड १०, गुहागर ३८, चिपळूण ४० (एकूण ९८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार खेड आणि गुहागर प्रत्येकी ३, चिपळूण आणि लांजा प्रत्येकी २, रत्नागिरी २३ आणि दापोली तालुक्या ७ (एकूण ४०) बाधित आढळले. (दोन्ही मिळून १३८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ७०८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख एक हजार दोन हजार ९१३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५९९ आहे. त्यातील सर्वाधिक ११७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून २९३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ४१० झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज पुन्हा कमी झाला असून तो ८९.९७ टक्के झाला आहे.
जिल्ह्यात आज दोन पुरुष रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. संगमेश्वर तालुक्यातील ५६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू काल झाला होता. त्याची नोंद आज झाली. शिवाय रत्नागिरी तालुक्यातील ८८ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्या दोन्हींची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३८२ असून मृत्युदर ३.२६ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ६९ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७५४४ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ७२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज १७, तर एकूण ६६२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज जिल्ह्यात दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. निरवडे (वैभववाडी) येथील ६१ वर्षीय पुरुष आणि मिठबाव (देवगड) येथील ९० वर्षांच्या महिलेचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media