नवीन वर्षाची सुरुवात `कीर्तनसंध्या`च्या `योद्धा भारत` आख्यानाने

रत्नागिरी : गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाची सुरुवात (१३ एप्रिल) यावर्षी `कीर्तनसंध्याच्या `योद्धा भारत` आख्यानाने होणार आहे. सध्या करोनाचे युद्ध जगभरात सुरू असताना प्रत्यक्ष रणभूमीवर प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर वीरांची कथा कीर्तनाच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याचा अनोखा योग रसिकांना साधणार आहे. रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे योद्धा भारत मालिकेत गेल्या वर्षी झालेली कीर्तने यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या कीर्तनमालिकेत महाराष्ट्राचे सुपुत्र परम विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे विचार ऐकण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.


सलग नऊ वर्षे रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी कीर्तने सादर करत आहे. दरवर्षी वाढता प्रतिसाद लाभणाऱ्या या मालिकेचा दशक महोत्सव यावर्षी केला जाणार होता. मात्र करोनामुळे ते शक्य नव्हते. तरीही देशाभिमान जागविण्यात खंड पडू नये, यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून यावर्षी योद्धा भारत मालिकेतील पुढची कीर्तने सादर करण्यात आली. त्याला रसिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन गेल्या वर्षीची, २०२० सालची कीर्तने यूट्यूबवरून रसिकांसाठी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कीर्तनांमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९७१ पर्यंत झालेल्या युद्धांचे वर्णन आणि त्यात मर्दुमकी गाजवलेल्या योद्ध्यांची गाथा मांडण्यात आली आहे.

गेल्या वर्षी प्रत्यक्ष सादर झालेली योद्धा भारत नावाची ही कीर्तनमालिका यूट्यूबवरून प्रसारित केली जाणार आहे. चारुदत्त आफळे बुवांच्या वाणीतून १९४७ नंतरच्या भारतीय युद्धांची कहाणी रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता येईल. सर्व कीर्तनांच्या पूर्वरंगात रामायण आणि उत्तररंगात १९४७-१९७१ कालावधीतील युद्धाच्या रोमांचक कथा सादर करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या युद्धांचा इतिहास, भारतीय जवानांचे युद्धकौशल्य, जोडीला आफळे बुवांचे तडफदार सादरीकरण हेच तर कीर्तनमालिकेचे वैशिष्ट्य आहे. त्यातील पहिले कीर्तन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१३ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता Kirtansandhya Ratnagiri या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचे संस्थानांच्या विलीनीकरणासाठी केलेले विशेष प्रयत्न, 22 ऑक्टोबर 1947 रोजी श्रीनगरवर झालेला पहिला हल्ला, त्यातील भारतीय सैनिकांचा पहिला पराक्रम, राजेंद्रसिंह यांचे युद्धकौशल्य, उरीचा पूल उडविण्यासाठी स्फोटकांचा प्रथम झालेला वापर, श्रीनगर विमानतळ राखायचे उद्दिष्ट, मेजर सोमनाथ शर्मा यांचे युद्धकौशल्य इत्यादींचे वर्णन पहिल्या दिवशीच्या कीर्तनात आहे. मालिकेतील पुढची कीर्तने अनुक्रमे १७ एप्रिल, २४ एप्रिल, १ मे आणि ८ मे रोजी दिसू लागतील.

कीर्तनसंध्याच्या https://youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA या चॅनेलवर ही कीर्तने अवश्य पाहावीत, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे.

ले. ज. राजेंद्र निंभोरकर यांना ऐकण्याची संधी

या कीर्तनमालिकेत महाराष्ट्राचे सुपुत्र परम विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे विचार ऐकता येणार आहेत. निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीत विशेष भूमिका बजावली होती. रद्द करण्यात आलेले काश्मीरविषयक ३७० कलम, नागरिकत्वाविषयीचे विचार त्यांनी व्यक्त केले आहेत. त्यांचे युद्धातील प्रत्यक्ष अनुभव ऐकण्याची संधीही रसिकांना लाभणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply