रत्नागिरी : भारत सरकारच्या कॉयर बोर्डाचे एक दिवसीय प्रशिक्षण गुरुवारी (२ सप्टेंबर) रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. नारळ दिनाच्या मुहूर्तावर हे शिबिर होणार आहे.
कोकणातील युवकांच्या हाताला रोजगार देणार असल्याचे आश्वासन देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत दिले होते. त्याची सुरुवात रत्नागिरीत कॉयर बोर्डाच्या प्रशिक्षण शिबिराद्वारे होत आहे.
निसर्गाच्या वैविध्याने नटलेल्या कोकणातच रोजगाराच्या अनेक संधी आहेत. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. देशातील ८० टक्के उद्योग ज्या खात्याशी निगडित आहेत, त्या केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या मंत्रिपदाची जबाबदारी नारायण राणे यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. श्री. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये तरुणांच्या, महिलांच्या हाताला उद्योग, रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले होते. ही जनआशीर्वाद यात्रा संपून अद्याप आठवडासुद्धा पूर्ण झाला नाही, तोपर्यंत यावर कामाला सुरुवात झाली आहे.
रत्नागिरीतील भाजपा पदाधिकारी बिपिन शिवलकर केंद्र सरकारच्या कॉयर बोर्डावरील संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव सदस्य आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली कॉयर बोर्डाच्या काथ्या उद्योगावर आधारित एक दिवसाचा जनजागृती कार्यक्रम उद्या, २ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील नगर वाचनालय सभागृहात होणार आहे. सकाळी ११ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यावेळी कॉयर बोर्डाच्या उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास बिटलिंगू, माजी नायब तहसीलदार रूपेंद्र शिवलकर आणि माजी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आवाहन बिपिन शिवलकर (94220 54497) यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
