रत्नागिरी केंद्र
आजचे नाटक (२५ मार्च २०२२, सकाळी १०.३० वाजता) – आरंभी स्मरितो पाय तुझे
सादर करणारी संस्था – संक्रमण, पुणे
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोजचे नाट्यप्रयोग होतील. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)
आज २५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आरंभी स्मरितो पाय तुझे हे नाटक संक्रमण, पुणे ही संस्था सादर करणार आहे.
संक्रमण पुणे ही संस्था गेले १५ वर्षे प्रायोगिक नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. संस्था दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, बाल नि संगीत राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी होते. संस्थेने आजतागायत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. आरंभी स्मरितो पाय तुझे हे संगीत नाटक साठाव्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी संपूर्ण नव्याने लिहिलेले असून या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत त्याचा पहिलाच प्रयोग आहे.
मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचे संपूर्ण नाव विष्णु अमृत भावे. सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णुदासांना होता. १८४२ मध्ये कर्नाटकातून ‘भागवत’ नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली आणि हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले.
त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ‘सीता स्वयंवर’ या मराठीतील पहिल्या नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भाव्यांनी स्वत:च नवीन पदांची रचना केली. ‘सीतास्वयंवर’ आणि ‘अहिल्योद्धार’ आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्ये ‘सीतास्वयंवर’ या स्वतःच लिहिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला.
त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले. सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन, सरस्वतीस्तवन, गजानन आणि सरस्वती यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येऊन आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहिलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला ‘कचेरी’ असे नाव दिलेले होते. भावे यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदासांच्या नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. या पखवाजाच्या आवाजावरून या नाटकांना ‘तागडथोम नाटके’ असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या ‘अलल् डुर्र’ अशा डरकाळीमुळे ‘अलल् डुर्र’ नाटके असेही त्यांना संबोधिले जात असे.
विष्णुदासांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी ‘सीतास्वयंवर’ या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला .पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळ करीत असत. त्यांनी बनविलेल्या, खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटाऱ्यात पडून राहिल्या होत्या आणि भावे यांच्या कठपुतळी खेळाच्या तीन-चार संहिता उपलब्ध आहेत. द्रौपदीस्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे असून या कठपुतळ्या लाकडी असल्या, तरी अतिशय
हलक्या होत्या. रेखीव आकार, प्रमाणबद्धता असून त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोन्ही प्रकारे खेळवता येत.
भावे यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांतील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानक रचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदांत केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ‘नाट्याख्याने’ असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत. भावे यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्यकवितासंग्रह (१८८५) या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. विष्णुदासांच्या या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.
विष्णुदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली. हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८४३ साली मुंबईच्या दौऱ्यापासून या सांगलीकर मंडळींनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरू केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करून १८५१ ते १८६२ सालापर्यंत एकूण सात दौरे केले. १४-२-१८५३ साली प्रथमच वृत्तपत्रातून जाहिराती आल्या. मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच गोपीचंद या हिंदी नाटकाचा प्रयोग १९५४ मध्ये झाला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदासांचे नाव झाले. या विष्णुदासांनी एकूण ५२ नाटके लिहिली. त्यांची सर्व नाटके पौराणिक होती. हा काळ धर्मप्राबल्याचा असल्याने ते स्वाभाविक होते. पुढे १८६२ सुमारास विष्णुदासांनी नाट्यसंन्यास घेतला. पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटक मंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णुदास भावे यांच्या पद्धतीच्या नाटकांची परंपरा १९१० सालापर्यंत चालू ठेवली. नाट्याचार्य विष्णुदास अमृत भावे यांचे ९ ऑगस्ट १९०१ रोजी निधन झाले. त्यांच्या नावाने भावे पुरस्कार ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनी देण्यात येतो.
अशा या विष्णुदासांच्या जीवनावर आधारित आरंभी स्मरितो पाय तुझे हे संगीत नाटक साठाव्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी संपूर्ण नव्याने लिहिले आहे. राज्य नाट्य स्पर्धेत त्याचा पहिलाच प्रयोग आहे. लेखक यतिन माझिरे यांनी विष्णुदास भावे यांचा सीता स्वयंवरचा प्रवास दाखवला आहे. मराठी नि हिंदी नाट्यसृष्टीचे जनक असलेले विष्णुदास भावे यांच्यावर लहानपणीच गाण्याचे संस्कार कसे झाले, त्यांना लहानपणी कोणकोणत्या व्यक्ती भेटल्या, त्यांनी विष्णूवर कोणकोणते संस्कार केले, त्यामुळे नाटक, संगीत यांची मुळे त्यांच्या मनात कशी पेरली गेली हे नाटकात दाखवले आहे. स्वतः लेखकच दिग्दर्शक असल्याने नवनाट्याप्रमाणे रंगमंचावर च पात्रे रंग नि वेशभूषा करताना दाखवली आहेत. तसेच काही प्रसंग सुरू असतानाच पडदा उघडताक्षणी मोकळ्या असलेल्या रंगमंचावर प्रसंग सुरू असताना नेपथ्य लावले जाते. संगीत दिग्दर्शक कृष्णा चतुर्भुज यांनी या नाटकातील पदांना नव्याने चाली लावलेल्या आहेत.
श्रेयनामावली :
लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि वेशभूषा : यतिन माझिरे
संगीत दिग्दर्शन : कृष्णा चतुर्भुज
नेपथ्य : वैभव नवसकर
प्रकाशयोजना : अशोक पवार
ऑर्गनवादक : चैतन्य पटवर्धन
तबलावादक : सुखशांत पाटील
संवादिनी : अभिजित पाटसकर
पखवाजवादक : आदित्य मारणे
रंगभूषा-वेशभूषा : प्रियांका चांदेरे
भूमिका आणि कलावंत :
विष्णुदास भावे : अभिजित केळकर
सूत्रधार, फडणीस, महंत १ : कृष्णा चतुर्भुज
राणी : वेदवती परांजपे
परिपार्श्वक, पुरोहित, महंत २ : माणिक खटिंग
कानडी माणूस, भागवत मंडळी

स्पर्धेचे वेळापत्रक
२५ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – संक्रमण, पुणे, आरंभी स्मरितो पाय तुझे, लेखक व दिग्दर्शक : यतिन माझिरे.
२५ मार्च (सायंकाळी ७.०० वाजता) – श्रुती मंदिर, सोलापूर, सूर-साज, लेखक व दिग्दर्शक : श्रीमती विद्या काळे.
२६ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत गंधर्वगाथा, लेखक : प्रदीप ओक, दिग्दर्शक : संदेश जाधव.
२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
