रत्नागिरी : प. पू. स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या १८ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता रत्नागिरीत जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचे यंदाचे विसावे वर्ष आहे.
चालण्याने आरोग्याची चाचणी करता येते. आपला धीर, संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही चालण्याची स्पर्धा नाही. पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो, हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते. नाम घ्या. तेच अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देईल, असे स्वामी सांगतात. सकाळचे धुके, राजिवड्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे प्रसन्न वातावरण, समधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी क्षणभरचा दोनदा विसावा असे या छोट्या वारीचे स्वरूप असते.
पावस येथे सकाळी ९ वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे, नंतर शीण घालवण्यासाठी अल्पोपाहार, नंतर कोणत्याही वाहनाने रत्नागिरी येथे परत, अशी ही वारी असते. सर्वांनी शक्यतो पांढरा वेष परिधान करावा. पुरुषांसाठी पांढरी टोपी बरोबर आवश्यक, तसेच आवश्यक असल्यास पाणी बाटली आणावी. शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्यासाठीचे बूट/चप्पल घालावेत. येताना आपले नाव, पत्ता व फोन नंबर एका छोट्या कागदावर लिहून ते संयोजकांकडे द्यावे.
अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन (9860366991) आणि अनंत आगाशे (7083162975) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.