रत्नागिरी : येत्या २७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून त्यानिमित्ताने २५ जानेवारी रोजी भाजयुमोतर्फे चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
श्री. पटवर्धन यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “परीक्षा पे चर्चा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. परीक्षांचा विद्यार्थ्यांवर येणारा प्रचंड तणाव, त्यातून होणाऱ्या दुर्घटना यापासून विद्यार्थ्यांना मुक्तता मिळावी, तणाव कमी व्हावा, मुक्त मानसिकतेत परीक्षा देण्याचा माहोल तयार व्हावा, या उद्देशाने सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा पंतप्रधानांचा हा प्रयत्न खूप उपयुक्त ठरला आहे. यावर्षीही २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम दृक्श्राव्य माध्यमांची व्यवस्था करून प्रत्येक शाळेत आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.
या कार्यक्रमापूर्वी २५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन शाळा स्तरावर भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत पुढील विषयांवरील चित्र काढता येईल.
१) G -20 – जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, २) आझादी का अमृतमहोत्सव, ३) सर्जिकल स्ट्राईक, ४) करोना लसीकरणामध्ये भारत नं. १, ५) पंतप्रधानाच्या जनसेवेच्या विविध योजना, ६) स्वच्छ भारत अभियान, ७) आत्मनिर्भर भारत,
८) आंतरराष्ट्रीय योगदिन – मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, ९) बेटी बचाव बेटी पढाव, १०) चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला – मोदींचा संवेदनशील निर्णय.
स्पर्धा प्रत्येक हायस्कूलमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

