मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरू झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेत एक लाख २० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आज पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. मुंबईतील एक हजार १४८ शाळांमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती.
स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा आणि नाट्य स्पर्धेचा अंतर्भाव होता. स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन आणि निवडक नाटकांचे सादरीकरण बक्षीस वितरण कार्यक्रमात पाहायला मिळाले.
यावेळी मंत्री लोढा म्हणाले, प्रभू श्रीरामांच्या येण्याने संपूर्ण भारत राममय झाला आहे. त्यामुळे चित्रकला स्पर्धेतील ७० हजार चित्रे शाळा व जवळपासच्या मंदिरात लावण्यास सांगितले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या चरित्राचे संस्कार मुलांच्या मनावर झाले, याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हेच या स्पर्धेचे यश आहे.
कार्यक्रमाला आमदार पराग अळवणी, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री रमेश पतंगे, ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके, मुंबई महापालिका उपायुक्त चंदा जाधव पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

