जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने रत्नागिरीत २७ सप्टेंबरला पर्यटन परिषद

रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने रत्नागिरीत येत्या २७ सप्टेंबरला एमटीडीसीसह विविध संस्थांनी पर्यटन परिषद आयोजित केली आहे.

येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, लायन्स क्लब, जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालयालय यांच्यातर्फे पर्यटन परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे होणार आहे, अशी माहिती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

‘पर्यटन आणि शांती’ या संकल्पनेवर हा जागतिक पर्यटन दिन साजरा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रकिनारे, श्रीक्षेत्र गणपतीपुळ्यासारखे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ तसेच गड-किल्ले, सह्याद्रीचे खोरे, आकर्षक धबधबे, जागतिक दर्जाची कातळशिल्पे अशी पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. देश-विदेशातून आता फार मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असतात. येथे सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे.

पर्यटन विकासासाठी तालुक्यातून येणार्‍या मागण्या जिल्हा स्तरावरून मंत्रालय स्तरावर जाऊन त्याचा पाठपुरावा केला जातो. शासनातर्फे नवीन पर्यटन धोरण जाहीर झाले, त्यामध्ये पर्यटक व्यावसायिकांना अनेक सब्सिडी देण्यात आलेल्या आहेत. त्याचे मार्गदर्शनही यावेळी होणार आहे. संस्थेतर्फे अनेक वर्षांपासून कार्यक्रमांमुळे पर्यटन चळवळ वाढत आहे.

या परिषदेस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी देवेन्दर सिंह, माजी खासदार नीलेश राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार, कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे हणमंत हेडे, माजी आमदार बाळासाहेब माने, चिपळूणचे आमदार शेखर निकम, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, संजय यादवराव, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पर्यटन क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींना ‘पर्यटन मित्र’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही परिषद सर्वांसाठी खुली आहे. यासाठी पर्यटनप्रेमी व तरुण व्यावसायिक, हॉटेल व टुरिस्ट गाड्यांचे व्यावसायिक, आंबा बागायतदार, होम स्टे, हाऊस बोट व्यावसायिक, टुरिस्ट गाइड, पर्यटन सहकारी संस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे. या परिषदेसाठी सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, कातळशिल्पतज्ज्ञ सुधीर रिसबूड व लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी आदी मेहनत घेत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply