चिपळूण : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (२ मे २०२६) चिपळूणमध्ये होणार असलेल्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला प्रोत्साहन देणारे हे पुरस्कार आहेत. ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान’चे संयोजक आणि मुंबईच्या विश्व संवाद केंद्राचे धोरणप्रमुख डॉ. निशीथ भांडारकर यांनी याबद्दल माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकार मेघराज जाधव (रायगड) यांच्यासह उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत (सिंधुदुर्ग), समीर जाधव (चिपळूण), मयूरेश पाटणकर (रत्नागिरी) आणि ऋषभ तोडणकर (सोशल मीडिया/यू-ट्यूब) अशा पाच जणांचा गौरव केला जाणार आहे. शनिवारी, २ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत चिपळूणमधील डीबीजे कॉलेजमध्ये नवनोकण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हा सन्मान सोहळा होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक व लेखक अभिजित जोग या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल’चे संपादक प्रसाद काथे हेदेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘पत्रकारिता हे केवळ माहिती पोहोचवण्याचे साधन नसून तो राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे, असा विश्व संवाद केंद्राचा विश्वास आहे. याच भावनेतून निर्भीड आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना हे व्यासपीठ दर वर्षी गौरवते,’ असे डॉ. भांडारकर यांनी सांगितले. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि सहयोगी संस्था नवनोकण एज्युकेशन सोसायटी यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

