रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ फेब्रुवारी) करोनाचे नवे १९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले. रत्नागिरीत १४, सिंधुदुर्गात ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १९ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि राजापूरमध्ये प्रत्येकी १, चिपळूणमध्ये ४, तर संगमेश्वरमध्ये ३ बाधित आढळले. रॅपीड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत ५, खेड आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १, तर संगमेश्वरमध्ये ३ रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९८०६ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी २५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७६ हजार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११० आहे. त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९३०५ झाली आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजही कमी असल्याने करोनामुक्तीचा दर घटला असून तो आता ९४.८९ टक्के आहे. जिल्ह्यात आज एका मृत्यूची नोंद झाली. खेडमधील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू काल झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३५९ एवढीच असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (१९ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ६ करोनाबाधित आढळले, तर चौघे करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३८६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०३३ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ झाली आहे.
Follow Kokan Media on Social Media

