रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूणसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासन सज्ज आहे आणि नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेला संदेश असा – आज (१९ ऑगस्ट) सकाळी सात वाजता चिपळुणात वाशिष्ठी नदीची पाणीपातळी पाच मीटर म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणीपातळी १३२.९५ मीटर आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत २०५ मिमी पाऊस पडला आहे. सर्व मशीन बंद केलेली आहेत. सकाळी ९.५० वाजता भरती आहे. त्यामुळे पुढील ३ तास महत्त्वाचे आहेत. नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफ यांची पथके ११ ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. तसेच पाच ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी सात वाजताच्या स्थितीनुसार, जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीच्या वरूनच वाहत असून, लांज्यातल्या काजळी नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. राजापुरातली कोदवली नदीही इशारा पातळीच्या वरून वाहत असून, राजापूर शहरात जवाहर चौकापर्यंत पाणी आले आहे. दरम्यान, अणुस्कुरा घाटात आज पहाटे दरड कोसळली असून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शीळ-गोठणे-दोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे.

