चिपळूण : अतिवृष्टीमुळे चिपळूणच्या काही भागांमध्ये सध्या पाणी आले आहे. आज (१९ ऑगस्ट २०२५) दुपारी एक वाजता चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी नागरिकांना दिलेला संदेश पुढीलप्रमाणे
सध्या वाशिष्ठी नदीची पाणीपातळी ५.८८ मीटर म्हणजेच इशारा पातळीच्या वर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३५ मीटर आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी आठपासून आज आठपर्यंत म्हणजे २४ तासांमध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. नवजा येथे काल आठ वाजल्यापासून आज आठ वाजेपर्यंत ३१६ मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत ९२ मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९.५० वाजता भरती होती. दुपारी ३.५० वाजता ओहोटी आहे. रात्री ०८.०९ वाजता ३.३३ मीटरची भरती आहे. शहरात ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. पाच ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, आइस फॅक्टरी, पेठमाप, इंडियन जिम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोळकेवाडी धरणाच्या मशीन ५.३० वाजता बंद करण्यात आलेल्या होत्या. परंतु कोळकेवाडी धरणाची पाणीपातळी वाढत असल्याने १.१० वाजता एक मशीन सुरू करण्यात येणार आहे. ते पाणी चिपळूण शहरामध्ये दोन वाजता येईल. दसपटी भागातील पावसाचा जोर कमी झालेला आहे, ही दिलासादायक बाब आहे. सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, अशी माहिती चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते गावात सखल भागात पाणी आल्याने पाच कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं असून, जुवाड बेटावरच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. काजळी नदीचं पाणी रस्त्यावर आल्याने रत्नागिरी तालुक्यातल्या चांदेराई आणि हरचिरीमधली वाहतूक बंद आहे.

