रत्नागिरी : रत्नागिरीतील सौ. विशाखा मोहन भिडे पहिल्या महिला कीर्तन अलंकार पदविकाधारक ठरल्या आहेत. त्यानिमित्ताने उद्या (दि. ११ डिसेंबर) त्यांचा रत्नागिरीत सत्कार करण्यात येणार आहे.
दादर (मुंबई) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेतर्फे दरवर्षी कीर्तनविषयक परीक्षा घेतल्या जातात. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे हभप महेशबुवा काणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संस्थेचे केंद्र चालविले जाते. सौ. भिडे यांनी तीन वर्षे अभ्यासक्रम असलेल्या या परीक्षेत A+ ग्रेड मिळविली आणि त्या पहिल्या आल्या. ही परीक्षा ६ डिसेंबर रोजी ही परीक्षा चिपळूण केंद्रावर झाली. मुंबई, इचलकरंजी, मंडणगड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी येथून चिपळूण येथे कीर्तन अलंकार पदविकेचे शिक्षण घेण्यासाठी अनेक जण प्रवेश घेतात. पुण्यातील कै. हभप भास्करबुवा घैसास, रत्नागिरीतील हभप नानाबुवा जोशी यांचेही उत्तम मार्गदर्शन मिळाल्याने मी हे यश प्राप्त करू शकले, असे सौ. भिडे म्हणाल्या.
सौ. भिडे यांच्या या यशाबद्दल उद्या रत्नागिरीत नारायणी मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. साळवी स्टॉप-नाचणे रस्त्यावर (आगाशे स्टोअरसमोर) सौ. वंदना घैसास यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता हा समारंभ होणार आहे. नारायणी मंडळाच्या भगिनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
Follow Kokan Media on Social Media

